बंगलुरू – केंद्र सरकारने गृहकर्जावरील व्याज माफ करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील खासदार राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. या संबंधात त्यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांना अधिकृत पत्रही लिहीले आहे. त्यांनी रेरा संबंधी झालेल्या एका बैठकीचा संदर्भ दिला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की रेरा विषयक नियमातून बांधकाम व्यावसायिकांना सहा महिन्यांची सूट देण्यात आली आहे.
जर बांधकाम व्यायसायिकांना सरकार सूट देऊ शकते तर गरीब व मध्यमवर्गीयांनाहीं त्यांनी व्याज दर माफीची सूट दिली पाहिजे. निदान तीन महिन्याचे जे हप्ते पुढे ढकलण्याची अनुमती देण्यात आली आहे त्या काळातील व्याज तरी सरकारने माफ केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्ज काढून घर विकत घेणाऱ्यांवर सध्या मोठी संक्रात आली असून त्यांना सध्या घरभाडे आणि घराचे हप्तेही द्यावे लागत आहेत.
बांधकाम व्यावसायिकांना जितक्या काळासाठी लॉकडाऊन सुरू होते तितक्याच कालावधी करीता प्रकल्प पुर्ण करण्यास मुदत वाढ द्यावी त्यांना सरसकट सहा महिने मुदत वाढ देणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे.