मुंबई – जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात; तेव्हा चर्चा तर होणारच. दोघांच्या भेटीबाबत भाजप नेत्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. यावेळीही ते चुकतील, असे मिश्कील आणि सूचक भाष्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महाराष्ट्राशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते.
त्या बैठकीशिवाय मोदी आणि ठाकरे यांच्यात स्वतंत्र भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सनसनाटी निर्माण झाली आहे. त्या घडामोडीवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे-मोदी चर्चा सुरू असताना बाहेर दोन खंबीर शिलेदार होते, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणतात, घाबरण्याचे कारण नाही
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकारला कुठला धोका नसल्याच्या आशयाची प्रतिक्रिया दिली. मोदी-ठाकरे यांच्यातील स्वतंत्र भेटीमुळे घाबरण्याचे कारण नाही. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर आम्ही सलोख्याचे संबंध ठेवतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत, असे ते म्हणाले.
वैयक्तिक भेट ही चांगलीच गोष्ट-फडणवीस
मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. वैयक्तिक भेट ही चांगलीच गोष्ट आहे. केंद्राबरोबरचा समन्वय राज्यासाठी सहाय्यकारीच आहे. संवादाचा नेहमी फायदाच होतो. मात्र, 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय पंतप्रधानांकडे मांडणे हे मुळातच विचित्र आहे. तो विषय केंद्र सरकारच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या हातातील नसून राज्यपालांच्या कार्यकक्षेतील आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.