मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेते सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी अभिवादन केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला देखील लगावलाय.
नारायण राणे ट्विटमध्ये म्हणतात, “माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती”. अस म्हणत त्यांनी शिवसेनेला म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.
तसेच “महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते”, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. (१/२) pic.twitter.com/2mcFaZlfoK
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 17, 2020
दरम्यान, भाजपने शिवसेनेसोबत युती करुन निवडणूक लढवली होती. परंतु निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचं एकत्रित सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, विरोधी पक्षाकडून वारंवार महाविकासआघाडीवर टीका केली जात आहे.