नवी दिल्ली – भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देणारे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल त्यांच्यासोबत ही यात्रा करत आहेत. त्यांच्या या यात्रेत त्यांची स्वत:ची बहिण त्यांच्यासोबत जोडली गेली नाही तर ते भारत कसा काय जोडणार अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या ठाकूर यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्या निमित्ताने एका वाहिनीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. हिमाचल प्रदेशात आमच्या सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असा दावा त्यांनी केला. राज्यात मोठे बदल झाले असल्यामुळे सरकार बदलणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की ज्या लोकांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांना हिमाचलची जनता कधीही थारा देणार नाही. कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आपले जवान बुलेटप्रुफ जॅकेटची मागण करत होते तेव्हा त्यांना ते दिले गेले नाही. मात्र आमच्या सरकारने दोन लाख जॅकेट सैनिकांना दिले.