बीड: बीडमध्ये भाजपच्या लोकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गावागावात जावून नोंद केली. भाजपला मतदान करणाऱ्या शेतकऱ्याचाच ऊस वैद्यनाथ कारखान्यात स्विकारला गेला. ऐन संकटाच्या काळात राजकारण करत, पक्षपातीपणा करत शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली. हा अन्याय माझा शेतकरी बांधव कधीच विसरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले. ते बीड लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज परळीत बोलत होते.
मुंडे म्हणाले, मी साडे चार वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केले त्याने आपल्या भागाची प्रतिष्ठा वाढली. यासाठीचं प्रेरणास्थान इथली मायबाप जनता आहे. हे सारं वैभव तुमचं आहे. या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आपले लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा यांना प्रचंड मताधिक्य मिळणार याची मला खात्री आहे.