भोपाळ – निवडणुका जिंकण्यासाठी भाजपची भिस्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी कायदे, वाढते इंधन दर आदींवरून जनतेत असलेल्या संतापाची फिकीर त्या पक्षाला वाटत नाही, अशी शाब्दिक टोलेबाजी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केली.
विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. ईव्हीएममुळेच भाजपला विजयी घोडदौड करणे शक्य होत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून केला जातो. त्याचा आधार घेऊन दिग्विजय यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलवरील कर 10 पटींनी वाढला आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. गॅस सिलिंडर सुमारे 300 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या 80 टक्क्यांहून अधिक लाभार्थींना सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यातून जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. ते पाहून बहुतांश राजकारण्यांना चिंता वाटते, असे ते मध्यप्रदेशात एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ईव्हीएम विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्विजय यांचा समावेश आहे.