पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात पर्यावरणपूरक शहरांपैकी एक शहर आहे. शहराचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. तळवडे येथे महापालिकेच्या वतीने जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. साधारण 50 एकरमध्ये उभारण्यात येणार्या या पार्कमुळे पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळी ओळख निर्माण होणार असून नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे.
असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आणि नागरिकांना रानजाई महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
पिंपरी चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व 27 वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात 1 ते 3 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
उप आयुक्त रविकिरण घोडके म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा बराचसा भाग हा हिरव्यागार वृक्षांनी वेढलेला आहे. या पर्यावरणपुरक वातावरणामुळे हे शहर सगळ्यात राहण्यायोग्य शहरांमधील एक शहर आहे. उद्यान विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड केली जात असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमधील जैवविविधता उद्यान हा महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना स्वच्छ हवा तसेच पर्यावरणपूरक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, माजी नगरसेवक सुनील कदम, वृक्ष प्राधिकरण समितीचे संभाजी बारणे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान अधिक्षक राजेश वसावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.