मांडवगण फराटा – करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत हॉटेल्स आणि मॉल्स बंद असल्याने पुणे जिल्ह्यात मशरुम उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील मशरूम उत्पादकांना विक्रीसाठी तयार असलेले शेकडो टन मशरूम फेकून देण्याची वेळ आली आहे. यात सुमारे 25 ते 30 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे मशरुम उत्पादकांचे म्हणणे आहे.
मशरुम पिकाचा कालावधी हा चार ते पाच दिवसांचा असतो. काढणी केल्यानंतर साधारणत: चार दिवसांत मशरुम ग्राहकांपर्यंत पोहचवणे आवश्यक असते. त्यामुळे तयार झालेला मशरूम शिल्लक राहिल्यास फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही, मशरुमची विक्री ही मुख्यत: हॉटेल आणि मॉलमध्येच होते. किरकोळ विक्रीचे प्रमाण फारच कमी आहे. दीड टनांच्या प्रकल्पाला टाळेबंदीच्या काळात सुमारे दोन कोटी रुपयांचे सरासरी नुकसान होत आहे. विविध शहरांमधील मशरूमची विक्री होते. मशरूमला लॉकडाऊनअगोदर साधारणपणे 140 ते 170 रुपयांचा दर मिळत होता. सध्या ग्राहकांना किरकोळ विक्री केली जात आहे. त्यासाठी उत्पादकांना केवळ 40 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे विक्री करणे परवडत नसल्याने मशरुम फेकून द्यावा लागत आहे.
जिल्ह्यात 10 ते 12 मशरूम उत्पादन प्रकल्प आहेत. त्यांची सरासरी उत्पादन क्षमता दीड टन धरली तरी तीन महिन्यांत साधारणपणे पंधराशे ते दोन हजार टन मशरुम फेकून द्यावा लागला आहे. यातून उत्पादकांचे सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील काळात टाळेबंदी उठल्यानंतरही व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास कालावधी लागणार आहे. मात्र, त्यावेळी मजुरांचा पगार, वीजबिल आणि बॅंकांच्या कर्जाचे हप्ते, अन्य खर्चांचा भार उत्पादकांवर पडणार आहे.
आमच्या प्रकल्पात दररोज दीड टन मशरुमचे उत्पादन होत असते. मशरुम उत्पादन घेण्यासाठी दोन महिने अगोदर बेडवर लागवड करावी लागते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मशरुमच्या मागणीवर परिणाम होत गेला. मशरुमच्या एका बॅचचा लागवडीचा खर्च, कामगारांचा पगार, वीजबील, पॅकेजिंगचा खर्च, वाहतूक असा दरमहा 52 लाख 45 हजार रुपये खर्च येतो. यातून साधारणत: आठ लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. नफ्यातून कर्जाचे हप्ते भरले जातात. तीन महिन्यांत एकूण एक कोटी 90 लाखांच्या आसपास आमचा तोटा झाला आहे.
-आदिक कुसेकर, आंधळगाव