पाटणा – बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या आहेत. पक्षाकडून याचा इन्कार करण्यात आला असला तरी त्याहीपेक्षा मोठ्या बातमीने पुन्हा डोके वर काढले आहे. ती म्हणजे नितीश कुमार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये परत येण्याची शक्यता आहे आणि एक नेता याकरता बोलणी करण्यासही तयार आहे.
नितीश कुमार यांचे एकेकाळचे सहकारी आणि आरएलजेडीचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाणे हे नितीश यांचे आत्मघाती पाउल होते. जर नितीश यांनी सार्वजनिरित्या राजदशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली आणि पुन्हा एनडीएत परतण्याचे म्हटले तर त्यांना परत घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीची मंडळी घेतील मात्र नितीश यांच्यासाठी शिष्टाई करण्याची आपली तयारी आहे.
दरम्यान, राजदच्या प्रवक्त्याने कुशवाह यांच्यावर टीका केली आहे. कुशवाह यांनी अगोदर ते कुठे आहेत आणि त्यांचा पक्ष कुठे आहे ते पाहावे. त्यांना स्वत:ला भाजपसोबत जायचे आहे, मात्र भाजप त्यांना भाव देत नाहीये. भाजपने त्यांना अशा चक्रव्यूहात फसवले आहे की ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते असितनाथ तिवारी यांनीही कुशवाह यांना लक्ष्य केले आहे. कुशवाह यांनी अगोदर ते कुठे आहेत ते सांगावे. कधी ते म्हणतात संयुक्त जनता दल कुठेच राहणार नाही, मग म्हणतात राजद राहणार नाही. पण हे बोलणारे कुशवाह कोण आहेत आणि त्यांना हे विचारते कोण असा प्रश्न तिवारी यांनी केला.
दरम्यान, भाजपने नितीश यांच्यावर टीका केली आहे. अनेक वर्षे ज्यांना विरोध केला आज त्यांच्याच मांडीवर जाऊन नितीश बसले आहेत. मांडीवर कसले ते त्यांचे द्वारपाल झाले आहेत. लालूंसोबत जाणे संयुक्त जनता दलाची शेवटची चूक होती असे भाजपचे प्रवक्ते कुंतल कृष्ण यांनी म्हटले आहे.