मुंबई : देशभरात टोमॅटोनंतर आता कांद्याच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहे. या सगळ्यात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा भविष्यात मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.