मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याप्रकरणी 4 मे चा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून मनसेच्या अनेक बड्या नेत्यांना 149, 178, कलमांतर्गत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी नेते पदाधिकाऱ्यांना भूमिगत होण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, गजानन काळे यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी नाॅटरिचेबल झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे, औरंगाबादेतील सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरूद्ध औरंगाबादच्या सीटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गन्हा दाखल करण्यात आला आहे. 153, 116, 113, 135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह राजीव जवळेकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या होत्या त्यापैकी 12 अटींचे त्यांच्या भाषणात उल्लंघन झाले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी दिलेल्या भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटममुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर राज्य पोलिस दल सतर्क झाले असून मनसे नेत्यांची धरपकड सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.