मुंबई – समीर वानखेडे यांच्या परिवाराने मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे पत्र लिहिले. यावर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते पुढे आले आहेत. मात्र राक्षसाचा जीव पोपटात आहे, या कथेचे उदाहरण देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
भाजपसारख्या राक्षसी विचारांच्या लोकांना आता चिंता वाटू लागली आहे की, जर पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी वानखेडे यांनी कारवाईची मालिका सुरु केली, ज्यामध्ये निशाणा साधून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. योगी सरकार आपल्या राज्यात फिल्म सिटी घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. मात्र हे बॉलिवूड उभारण्यासाठी अनेक मराठी दिग्गज कलाकारांनी योगदान दिले असल्याचे मलिक यांनी सांगितले.
विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आत्ता बोलल्यावर ते कोर्टात जातील. विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार त्याचे उत्तर देताना जे काही मी समोर आणणार आहे. त्यामुळे या राज्यात त्यांना तोंड दाखवणं अवघड होणार आहे.
अनेकांचा ड्रग्ज प्रकरणाची संबंध आहे. नेत्यांचे नाव आज मी घेत नाही. हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझे नाव घेऊन माझ्यावर हल्ले होणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठी-मोठी नावे समोर येणार असे सूचक वक्तव्यही नवाब मलिकांनी केले आहे.