नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. कारण निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर जाताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर भाजपाला आणखी मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे.
भाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे हे चौघे भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत असल्याचे म्हटले जात आहे. भाजपाचे खासदार शांतनु ठाकूर आणि अन्य तीन आमदार शुक्रवारी दिलीष घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते. मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी हे घडले.
सीएए कायदा लागू करण्यावरून खासदार शांतनु ठाकूर भाजपावर नाराज असल्याचे समोर आले होते. बंगालच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या मतुआ समुदायातून ठाकूर येतात. तर विश्वजित दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे तीन आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दलही चर्चा होत आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भाजपातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे भाजपाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.