नाशिक – शिवसेना-भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीची अचानक एंट्री झाल्यामुळे दोन्ही पक्षांना मिळणारी मंत्रिपदे कमी झाली. पूर्वी भाजप- शिवसेनेला निम्मी-निम्मी पदे ठरली होती. मात्र आता राष्ट्रवादीने अकस्मात 9 मंत्रिपदे पटकावली, त्यामुळे दोघांचाही कोटा 5-5 ने घटला.
भाजपने हा निर्णय विनातक्रार मान्य केला. पण शिंदेसेनेच्या आमदारांचा मात्र “तिळपापड’ झाला आहे. “राष्ट्रवादीला सोबत घेणे आमची गरज नव्हती, त्यामुळे आमची मंत्रिपदे कमी करू नयेत’ अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
सध्या 43 पैकी 29 मंत्रिपदांचे वाटप झाले. आता उरली 14. त्यांचे समान वाटप व्हावे अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. पण शिंदे गटाला ते मान्य नाही. पूर्वी ठरल्यानुसार शिंदेसेनेच्या वाट्याला अजून 10 मंत्रिपदे येणार होती. मात्र आता हा आकडा 4-5 पर्यंतच राहू शकतो. यामुळे अस्वस्थ शिंदेसेनेच्या आमदारांच्या संयमाचा स्फोट झाला आहे. बुधवारी रात्री या आमदारांनी शिंदेंच्या कानावर आपल्या तक्रारी घातल्या. त्यानंतर गुरुवारी रात्री शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्यात आमदारांच्या व्यथा शिंदेंनी मांडल्या. फडणवीसांनीही त्यांच्यावर अन्याय होणार नसल्याचे सांगितल्याचे समजते.
‘रायगड’च्या ताब्यावरून लढाई
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आहेत. विस्तारानंतर ते भरतसेठ गोगावले यांना देण्याचे आधी ठरले होते. मात्र राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना ही जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे सहन करणार नसल्याचे गोगावलेंनी शिंदेंसमोर सुनावल्याची माहिती आहे. तर, नाशिकचे पालकमंत्रिपद दादा भुसेंकडे आहे. ते भुजबळांकडे देण्याच्या हालचाली आहेत. शिंदेसेनेचा त्यालाही विरोध आहे. मविआच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आमची निधीवरून कोंडी केली. आता तेच पालकमंत्री असतील तर निधी मिळणारच नाही. अशी भूमिका या नाराज आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.