बुलडाणा – समृद्धी महामार्गावर बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण अपघातामागील कारण काय? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात 30 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल आढळले आहे. त्यामुळ बसचालक मद्यधुंद असल्याने हा अपघात झाला?, असा संशय व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे बस अपघात 1 जुलैच्या पाहाटे दीड वाजेच्या सुमारास झाला होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने दुसऱ्या दिवशी दुपारी बसचालकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झाले असावे, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बसचालक शेख दानिश याने सुरुवातीला बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले होते. प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्यामुळे अपघात झाला का?, याचा तपास केला. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. पण रस्त्यावर टायर फुटल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.
अमरावतीच्या रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (आरएफएसएल) येथे केलेल्या तपासणीनुसार अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. सामान्यत: मानवी शरीराच्या 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम एवढे अल्कोहोल असते. त्यापेक्षा अधिक असल्यास ते मर्यादेपेक्षा अधिक समजले जाते. बसचालकाच्या रक्तात 30 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल आढळले आहे.
23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर –
बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आहे. यातील 23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून अद्याप दोन मृतदेहांचे अहवाल प्रलंबित आहेत.