भिगवण, (वार्ताहर) –भिगवण ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षांपासूनचे भंगार व इतर अनावश्यक साहित्य पडून होते. त्यामुळे ग्रामपंचतीने त्या साहित्याचा खुला लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पत्रा, लोखंड व इतर साहित्याच्या खुल्या लिलाव प्रक्रियेतून भिगवण ग्रामपंचायतीला तब्बल दोन लाख रु पेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाल्याची माहिती सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी दिली.
भिगवण ग्रामपंचायतीने स्वतःच्या ताब्यात असलेल्या पत्रा, लोखंड व इतर भंगार साहित्याची ’जेथे आहे, जसे आहे तसे’ अशा पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविली. यासाठी लिलाव बोली लावणार्यांसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम तर दोन हजार रुपये ना परतावा रक्कम ठेवण्यात आली होती. एकूण पाच व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदविला.
या लिलावाची प्रारंभिक बोली 40 हजार रुपये ठरविण्यात आली. यासाठी रीतसर जाहिरात व नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. या लिलावाकरिता इतर जिल्ह्यातील ठेकेदार आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ठेकेदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.