भिगवण, (वार्ताहर)- भिगवण ग्रामपंचायतमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्यावरून राजकारण सुरू असून नळ जोडणीबाबत दुजाभाव केला जात असून, नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत हकीकत अशी की, येथील (वॉर्ड नं. 4) एकाने नवीन नळ जोडणीसाठी ग्रामपंचायतमध्ये अर्ज सादर केला. मासिक सभेदरम्यान हा अर्ज वाचून दाखविण्यात आला यावर सरपंच दीपिका तुषार क्षीरसागर यांनी नळ जोडणी देण्यात यावी असे मत मांडले. यावर उपस्थित सदस्यांनी विरोध दर्शवत अर्जदाराने आधारकार्ड जोडले नाही.
दुष्काळ परिस्थितीत ग्रामपंचायत तीन महिने नळकनेक्शन देत नाही (ठरावात कोणती तीन महिने याचा उल्लेख नाही) अशी विविध कारणे देत अर्जदारास नळ कनेक्शन देण्यात येऊ नये, असा बहुमताने ठराव संमत केला. वास्तविक पाहता 7 मार्च 2024 रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये नळ कनेक्शन मागणी केलेल्या सात अर्जदारांना नळ कनेक्शन देणेबाबत ठराव संमत झाला.
त्याच महिन्यात म्हणजे 27 मार्च रोजी झालेल्या मासिक मिटिंगमध्ये आलेला अर्ज नाकारण्यात आल्याने लोकनियुक्त सदस्य पाणी वाटपामध्ये दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे. गावातील लोकांना पाणी पुरवठा करणे ही ग्रामपंचायतची प्राथमिक जबाबदारी असताना काही सदस्य कर्तव्यात कसूर करत आहेत.
त्यामुळे अशा ग्रामपंचायत सदस्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच तीन महिने नळ कनेक्शन देत नाही असा ठराव असेल तर मार्च महिन्यातच इतरांना नवीन नळ कनेक्शन कसे काय देण्यात आले? याचा कोणताही खुलासा ग्रामपंचायतने केलेला नाही हे विशेष.
पाणी ही अत्यावश्यक सेवा असून मूलभूत गरज आहे अर्जदारास त्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना लवकरच नळ कनेक्शन देण्यात येईल. -दीपिका क्षीरसागर, सरपंच भिगवण