भाटघर-भाटघर (ता. भोर) धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली असून, धरण 77 टक्के भरले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास येत्या चार-पाच दिवसांत धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याने यावर्षी धरण भरेल की नाही, या उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते; परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
पाऊस नसल्याने भाटघर परिसरातील भाताचे तरवे पाण्याविना पिवळे पडत चालले होते; परंतु सोमवार (दि. 3) पासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांचीही शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या दूर होणार आहे.
भाटघरच्या पूर्व दिशेकडील बारामती, इंदापूर या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असते. या तालुक्यातील शेती भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस न झाल्याने येथील शेतकरीवर्ग चिंतातूर होता. मात्र, सद्यःस्थितीला भाटघर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून शनिवार (दि.1) पासून302 मि. मी. पाऊस झाला आहे.