बंगळुरू -कर्नाटकची राजधानी बंगळुरूत झालेल्या हिंसाचारावरून सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) हा पक्ष रडारवर आला आहे. आता त्या पक्षावर बंदी घालण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. सोशल मीडियातील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे बंगळुरूत मंगळवारी रात्री जमावाने हिंसाचार केला.
हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. आता त्या हिंसाचारावरून एसडीपीआयच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे. हिंसाचाराबद्दल सुमारे 140 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एसडीपीआयच्या 4 सदस्यांचाही समावेश आहे.
मात्र, एसडीपीआयने हिंसाचारात सामील असल्याचा इन्कार केला आहे. दरम्यान, हिंसाचार झालेल्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षाबळ तैनात करण्यात आले आहे. तेथील स्थिती आता शांततापूर्ण आहे.