नागठाणे – भरतगाव (ता. सातारा) येथील पोलिस अधिकारी भास्कर दत्तात्रय कदम यांना दहशतवादविरोधी पथकात (एसटीएस) केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोैरविण्यात आले आहे.
श्री. कदम हे दहशतवादविरोधी पथकात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांना पकडण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. राष्ट्रपतीच्या शौर्यपदकानेही त्यांना यापूर्वी गोैरविण्यात आले आहे. ते सहभागी असलेल्या पथकास आंध्र प्रदेश सरकारचे प्रशस्तिपत्र तसेच आठ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांना गेली दहा वर्षे हवा असलेला कट्टर माओवादी नेता कृष्णा लिंगय्या घोक्ष उर्फ वेणुगोपालन यास या पथकाने शिताफीने अटक केली. सुरत ते मुंबईपर्यंतच्या औद्योगिक परिसरात नक्षलवादी चळवळीचा प्रसार करणे, तसेच या चळवळीसाठी आर्थिक निधी उभारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वेणुगोपालनवर होती. त्याच्या अटकेसाठी आंध्र प्रदेश सरकारने आठ लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले होते. त्याला “विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्या’नुसार अटक करण्यात आली आहे. एसटीएसचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व उपायुक्त मोहनकुमार दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात श्री. कदम यांचा सहभाग होता. त्यांचे अशोकराव पाटील, संजीवन कदम, सुरेश शेडगे, अजित जाधव, अर्जुनराव दीक्षित, विकास कदम तसेच भरतगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.