शिंदे वासुली -आठ दिवसांत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी मिटींग करुन धरणग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात समाधान कारक तोडगा काढू, असे आश्वासन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिले. यानंतर भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेले आमरण उपोषण आज संध्याकाळी सहा वाजता तुर्तास मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे उपोषण आणि जलसमाधी अशी दोन्ही प्रकारची आंदोलने स्थगित झाली असून पोलीस प्रशासनाची डोकेदुखी सध्यातरी थांबली असून जलवाहिनेचे काम आता किमान आठ दिवस तरी निर्धोक चालू राहणार आहे.
भामाआसखेड प्रकल्पग्रस्त अधिक संतप्त होऊन करंजविहीरे येथील धामणे फाट्यावर बुधवारी 19 तारखेपासून आमरण उपोषण चालू केले होते. तर प्रशासन, पालकमंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची दखल न घेतल्याने 23 गावांमध्ये प्रकल्पग्रस्तांनी पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करुन पोलीस प्रशासनाची धांदल उडवली होती. काल संध्याकाळी प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, खेड उपविभागिय अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपायुक्त यांनी आंदोलकांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली होती. आतापर्यंत ‘आधी काम बंद करा मगच चर्चा’ असा पवित्रा घेणाऱ्या आंदोलकांनी आमदार दिलीप मोहिते व काही ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांचा मान ठेवून एक पाऊल मागे घेतले.
आमदार दिलीप मोहिते आणि उपोषण करणाऱ्या आंदोलकांमध्ये सुमारे एक तास पुनर्वसनाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. सुरुवातीला आंदोलक आधी काम बंद करा मगच चर्चा या निर्णयावर ठाम होते.
आमदार आंदोलकांची समजूत काढण्यात यशस्वी झाले. अंतिमतः आमदारांनी पुढील दोन दिवसांत कोर्टात न गेलेल्या शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये अनुदान वाटप प्रक्रीयेतून बाकी असलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांशी बोलून ते देण्याची व्यवस्था करतो. आणि पर्याय जमीन वाटप आदेश असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात आठ दिवसांत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी शेतकऱ्यांसह मिटींग लावून योग्य व समाधानकारक तोडगा काढू. समाधान कारक तोडगा अथवा निर्णय न झाल्यास मी स्वत: तुमच्या बरोबर आंदोलनात सहभागी असेल. असे ठोस आश्वासन आंदोलकांना दिल्याने सर्व प्रकल्पग्रस्तांनी टाळ्या वाजवून संमती दिली.
यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनी पाणी पाजून उपोषण मागे घेतल्याचे आंदोलक सत्यवान नवले, देविदास बांदल, गजानन कुडेकर, नवनाथ शिवेकर, किसन नवले यांनी जाहीर केले.
दोषींवर कडक कारवाईचे संकेत
यावेळी आमदार मोहितेंनी भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटप व आर्थिक मोबदला वाटप प्रक्रियेमध्ये बराच काळा बाजार झाला असून भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी व आपली पोळी भाजून घेणाऱ्या काही प्रकल्पग्रसतांची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे कोणाचेही नाव न घेता संकेत दिले आहे.