अरुण गोखले
भक्ताने भगवंताची आर्तभावाने केलेली विनवणी, प्रार्थना म्हणजे भजन. देवाचे रूप, ध्यान, गुण ह्याचे स्तुतीरूप केलेले काव्यरूप वर्णन म्हणजे भजन. अभंग रचना हा भजनाचा आत्मा आहे. रुपाचे, ध्यानाचे, मागणीचे, विनवणीचे अभंग हे भजनात प्रामुख्याने गायिले जातात. साधारणपणे भजनाचा प्रारंभ हा रुपपर अभंगाने होतो. तर त्याचा शेवट हा भैरवी रागातील मागणी किंवा विनवणीच्या अभंगाने होतो. भजन योगसाधनेतील भक्तियोगाचा एक भाग आहे.
महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच भक्तिसांप्रदायाने ही भजन परंपरा पुढे कायम राखून हा सांस्कृतिक वारसा मोठ्या दिमाखाने जोपासला आहे. आपल्याकडे भजनाला संत रचनांची जोड मिळालेली आहे. त्यात संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, इ. संतांच्या रचनांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. संत एकनाथाच्या गवळणी हा भजन सादरीकरणातला एक खास लोकार्षणाचा भाग ठरत असतो.
भजन ही एक भक्तिमार्गातली साधना आहे. ते एक प्रकारचे वाचिक तप आहे. तो भक्त आणि भगवंत ह्याच्या मधला सुखसंवाद आहे. भक्तीत भजनाला फार मोठे महत्त्व आहे. भक्तीचा उमाळा आल्याशिवाय भजनाचे सूर गळ्यातून बाहेर पडत नाहीत.
भजन हे इतरांच्या सुखासमाधानासाठी नाही तर आपल्या आंतरिक स्वानंदासाठी गायचे असते. पूर्वीच्या काळी लोक उपलब्ध वेळेचा सदुपयोग करण्याच्या या हेतूने गावागावांतून विशिष्टवारी ही भजन सेवा देवाचे चरणी अर्पण करीत. त्यामधूनच उत्तम गायक, वादक, निवेदक ह्या सारख्या कलावंताचे उदय झाले.
भजनात रंग भरावा, त्याची श्रवण गोडी वाढावी, म्हणून त्याला तबलापेटी, टाळ मृदुंग, चिपळ्या, खंजिरी यांची साथ दिली जाते. खरे भजन हे एकतारीवरच गायले जाते. देवाच्या दारात केलेले भजन ही त्याची एक प्रकारची गायन सेवा किंवा स्वरपूजाच असते.
जनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात चक्रीभजन, सोंगी भजन आणि रिंगण भजन असे तीन प्रमुख प्रकार सांगितले जातात. भजनाच्या कार्यक्रमात एका अभंगाच्या शेवटच्या अक्षरापासून लगेच दुसरा अभंग म्हणत पुढे पुढे भजने म्हणणे म्हणजे ते होते चक्रीभजन. भक्त आणि भगवंत ह्यातील सोंगे घेऊन केलेला संवाद म्हणजे सोंगी भजन तर तीन भजनी मंडळांनी गोलाकार उभे राहून एका पाठोपाठ एक एक अभंग अखंडित म्हणत गेले की ते होते रिंगण भजन. भक्ताने भजनात देहभान हरपून जाणे ही भजनाची खरी फलश्रुती आहे.