जम्मू काश्मीर राज्यपालांचा नरमाईचा सूर
श्रीनगर – लोकांची प्राणहानी होण्यापेक्षा जम्मू काश्मीर मध्ये फोन सेवा सुरू नसण्याने फार काही बिघडणार नाही असे विधान जम्मू काश्मीरचे राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. सरकारी फौजा आणि काश्मीरातील नागरीक यांच्यात तेथे संघर्षाचे वातावरण कायम असल्याने गेले तीन आठवडे त्या राज्यात दूरसंचार सेवा आणि इंटरनेट बंद आहे तसेच नागरीकांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हे विधान केले.
पुर्वी काश्मीरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार व्हायचा पण आता तेथे गेल्या काही दिवसांत काहीं किरकोळ प्रकार घडता प्राणहानी झालेली नाही असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आमचा सारा प्रयत्न जीवित हानी होऊ नये यासाठी आहे. त्यासाठी फोन बंद ठेवायला लागला तरी काही बिघडत नाही असे त्यांनी म्हटले आहे.राज्यपाल मलिक हे दिल्लीत अरूण जेटली यांच्या अंत्यविधीसाठी आले होते. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काश्मीरातील निर्बंध लवकरच मागे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काश्मीरातील स्थिती आता वेगाने सुरळीत होत आहे असा दावाहीं त्यांनी केला. खोऱ्यात अन्न आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. काश्मीरात सुरक्षा सध्याल सुरक्षा व्यवस्थेसाठी एकूण 50 हजार सुरक्षा जवान तैनात आहेत.