बीड – राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. अनेक गावांमध्ये राजकीय नेते मंडळी, मंत्री, आमदार, खासदार यांना गावबंदी केली आहे.
ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषणे सुरु आहेत अशातच काही लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवला आहे.
दरम्यान, याआधी हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले तर सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
“महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.” असे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात लिहिले आहे.
जरांगे पाटील म्हणतात – राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या..
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचे आवाहन आमदार आणि खासदारांना केले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकारला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही.