नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेवर बोलताना एलएसी आणि एलओसीच्या वर वाकड्या नरजेने पाहणाऱ्यांना आपण सडेतोड उत्तर देवू शकतो आणि त्याचे उदाहरण नुकतेच जगाने लडाखमध्ये पाहिले असल्याचे म्हटले. मोदींच्या याच वक्तव्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत मोदींच्या भ्याडपणामुळे चीनने भारताची जमीन घेतल्याचा आरोप केला आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विट हल्ला केला आहे. प्रत्येकाला भारतीय लष्कराच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास आहे. फक्त पंतप्रधानांना वगळून. ज्यांच्या भ्याडपणाने चीनला आमची जमीन घेण्याची परवानगी दिली. ज्यांच्या खोटेपणामुळे हे निश्चित होईल की ते हे कायम ठेवतील, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Everybody believes in the capability and valour of the Indian army.
Except the PM:
Whose cowardice allowed China to take our land.
Whose lies will ensure they keep it.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 16, 2020
लडाख मुद्यावरून शुक्रवारीही राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले होते. केंद्र सरकार लडाखमधील मुद्यावरून चीनचा सामना करण्यास घाबरत आहे. तिथे घडत असलेल्या घटना या गोष्टीची साक्ष देत आहेत की, चीन स्वतःला तयार करत आहे आणि स्वतःची स्थिती मजबूत बनवत आहे. पंतप्रधानांकडे असलेल्या वैयक्तिक धाडसाच्या अभावामुळे आणि माध्यमांच्या मौनामुळे भारताला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे,असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
जूनपासून भारत-चीन सीमावाद चिघळला आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने आल्यानंतर मोठा लष्करी संघर्ष झाला होता. त्यात भारताचे जवान शहीद झाले होते. या संघर्षापासून सीमेवर तणाव असून, दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसकडून मोदी सरकारच्या चीनविषयक भूमिकेवर टीका केली जात आहे.