पिंपरी – देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, टिकली पाहिते. अनेक संकटे येऊ शकतात, परिस्थिती बदलत असते. आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहणार नाही. त्यामुळे सगळेच गेले असे समजण्याचे कारण नाही. सामर्थ्याने एका विचाराशी श्रध्दा ठेवून काम करणाऱ्यांना आयुष्यात यश मिळते. मात्र, काही जण अडचणीत आल्यामुळे भाजपच्या वळचणीला गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता केली.
प्रदेशाध्यक्ष पाटील सोमवारी (दि.9) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.
निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी सुरू असल्याबाबत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष शरद पवार यांचाच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाला काही अर्थ नाही. पक्षाची पायाभरणी पवार यांनीच केली आहे. देशातील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनही आयोगाने वेगळा निर्णय घेतल्यास अदृश्य शक्ती ढवळाढवळ करतेय काय हे कळेल.
भारतासारख्या लोकशाहीच्या देशात सर्व परिस्थिती नागरिक पाहत आहेत. त्यांना सगळ्यांना माहिती आहे काय सुरू आहे ते. सगळ्यांची बुध्दी शाबूत आहे. सगळ्यांचा मेंदू हा विश्लेषण करत आहे. आणीबाणीतही नागरिकांची सद्सद विवेक बुध्दी हलली नाही. राज्यकर्ते कसेही वागले तरी या देशातील मतदार नेहमीच आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे बदलेल्या परिस्थिीत या देशात लोकशाही टिकावी, योग्य कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी जाण्याची प्रेरणा मिळावी, देशातील मतदार सुजानपणाने वाटचाल करेल. रस्ते केले, विकास केला हे करणे तुमचे कर्तव्य आहे, आता देशातील निवडणुका या विकासावर होणार नसून विचारांवर होणार आहेत. कोणत्या विचारांच्या पाठीमागे राहायचे याचा निर्णय नागरिकांना घ्यावा लागेल, असेही पाटील म्हणाले.
दुसरी चोरी होऊ नये, म्हणून विठ्ठलाला साकडे
काळ, वेळ बदलली आहे. अनेक चोऱ्या होतात, आता पक्षाचीही चोरी व्हायला लागली आहे. पक्ष, चिन्ह काढून घेण्याचे मनसुबे शिवसेनेच्या बाबतीत घडले. पक्षाची चोरी होते हे या देशात एकदा घडलेले आहे. आता दुसरी चोरी होऊ नये, यासाठी विठ्ठलाने काही तरी व्यवस्था करावी, असे पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाला साकडे घातले आहे. आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे काम आम्ही करतो. मात्र, काय होईल माहिती नाही, खुर्चीत बसलेला असतो तो निर्णय देत नसतो. निर्णय दुसराच लिहून पाठवितो, हा फक्त वाचणार आहे. या देशात पक्ष चोरीला जायला लागले तर लोकशाहीच धोक्यात येईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय द्यावा, असेही पाटील म्हणाले.