पिंपरी – अजितदादा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना वाघ होते, मात्र भारतीय जनता पक्षात गेल्यापासून त्यांना निर्णय घेण्यापासून रोखले जातंय असं दिसतं. ते खरच कामात वाघ असतील तर वेदांता- फोक्सकोन, टाटा-एअरबस यांसारखे अनेक प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरातला नेले हे प्रकल्प अजितदादांनी पुन्हा महाराष्ट्रात आणावेत, असे आव्हान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने नटसम्राट निळू फुले सभागृहात रविवारी (दि.8) आयोजित केलेल्या महाराष्ट्राभिमान युवक मेळाव्यात शेख बोलत होते. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पक्ष निरीक्षक प्रकाश म्हस्के, राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, राहुल पवार, अमोल काळे, स्वप्नील गायकवाड, विश्रांती पडाळे, संदीप चव्हाण, गणेश भोंडवे, विशाल जाधव, सागर तापकीर, राहुल आहेर, पंकज बगाडे, विशाल शिरसागर आदी उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी पिंपळे गुरव भागात युवकांची दुचाकी रॅली काढत शहरांमध्ये शरद पवार गटाने शक्तिप्रदर्शन केले.