पुणे -येशू सगळ्यांसाठी आहे. त्यांचा संदेश सगळ्यांसाठी आहे. कोणाचीही कोणतीही विचार प्रणाली असो, ती ईश्वराची माणसे आहेत, अशी भावना प्रत्येक माणसाप्रती ठेवायला पाहिजे. सर्वधर्मीयांनी मानवतेवर निष्ठा ठेवावी. मतभेद कितीही असले तरी ते दूर करून प्रेमाने राहायला पाहिजे. राष्ट्रनिष्ठा ही एका समाजापूर्ती मर्यादित नाही. राष्ट्रनिष्ठेचा वारसा सगळ्यांचा आहे, ती सर्वांनी मिळून जपली पाहिजे, असे मत पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले.
ख्रिसमसनिमित्त डायोसिस ऑफ पुणे, स्वच्छंद पुणे आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने सर्वधर्मीय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, गांधीवादी विचारवंत अन्वर राजन, शिक्षणतज्ज्ञ ए. पी. कुलकर्णी, रवींद्र धंगेकर, कायदेतज्ज्ञ शिवराज कदम जहागिरदार, माधव पुंडे, रवींद्र शाळू, मोहन जवळकर, रॉकी गोम्स आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र शाळू यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देणार गीते यावेळी सादर केले. करुणा आणि सेवा ही शिकवण ख्रिस्ती धर्माने दिली. उपेक्षितांना सेवा देण्याचे काम ख्रिस्ती बांधव करतात. सर्व धर्मानी प्रेम ही शिकवण जगाला दिली आहे.
माझा धर्म श्रेष्ठ अशी भावना सध्या वाढत आहे. धर्माच्याबाबत प्रेम हीच भावना असली पाहिजे. मानवतेवर निष्ठा ठेवली तर धर्माच्या बाबतीत परिस्थिती बदलेल. धर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्यांना प्रेमाने उत्तर देऊ, असे राजन म्हणाले. कुलकर्णी यांचेही भाषण झाले.