पुणे -गेल्या काही वर्षांत वैचारिक जगतावर डाव्यांचा पगडा आहे. भारतीय संस्कृतीवर सातत्याने सर्व दिशांनी हल्ले करून तिला कोसळवणे, याचे नियोजनबद्ध प्रयत्न या वर्तुळातून सुरू आहेत. अशा वेळी भारताचे राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म याचा तितकाच समर्थ वैचारिक आवाज उमटायला हवा. या हल्ल्यांना त्याच तोडीचे वैचारिक प्रत्युत्तर द्यायला हवे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शुक्रवारी केले.
अरुण करमरकर लिखित “अलौकिकाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. पुणे मराठी ग्रंथालय आणि “परम मित्र पब्लिकेशन्स’ यांच्यातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, लेखक अरुण करमरकर, पब्लिकेशन्सचे माधव जोशी, ग्रंथालयाचे कार्यवाह सुधीर इनामदार आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर प्रशासनाची रचना आणि प्रशासनातील व्यक्तींचे वागणे, ज्या प्रमाणात बदलायला हवे होते, ते आजही बदललेले नाही. इंग्रजांनी पारध्यांना चोर ठरवले, पण आपण तो दृष्टिकोन बदलायला हवा. ते आपल्याच भारताचे नागरिक आहेत, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. कारण, जे काम पन्नास हजार व्यक्तींचा मोर्चा करू शकत नाही, ते काम एक कार्यक्षम अधिकारी केवळ एका स्वाक्षरीने करू शकतो, असे धर्माधिकारी म्हणाले.
सरस्वती समाजातील तीन टक्क्यांचीच आहे, असे कोणीतरी म्हटल्याचे मला ऐकीवात आले. पण मला जी सरस्वती दिसली, ती शंभर टक्क्यांचीच, किंबहुना तीन टक्के वगळून इतर 97 टक्क्यांचीच ती अधिक होती. अजिंठा-वेरुळ येथील अचंबित करणारी लेणी काही केंब्रिज किंवा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञाने उभी केलेले नाहीत. इथल्याच व्यक्तींनी ती उभी केली आहे. सरस्वती तीन टक्क्यांचीच असेल, तर त्यांना हे ज्ञान कोणी दिले? सरस्वतीने सगळ्यांनाच भरभरून दिले आहे, असे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. हे पुस्तक म्हणजे फक्त माझे चरित्र नाही, तर मी काम केलेल्या पारधी समाजाचे, सर्व भटक्या-विमुक्त जातींचे चरित्र आहे’, अशी भावना प्रभुणे यांनी व्यक्त केली.
प्रभुणे यांच्या कार्याचे सर्व पैलू उलगडण्याच्या हेतूने पुस्तकाचे लिखाण केले असल्याचे करमरकर यांनी सांगितले. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्रीकांत देव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुभांगी तांबट यांनी सूत्रसंचालन केले.