बहरीन :– आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तानला मिळालेले असले तरीही स्पर्धा अन्यत्रच होणार यावर ठामपणे मत व्यक्त केलेल्या बीसीसीआयचे सचिव जय शहा व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठकीतच शाब्दीक चकमक घडली.
ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळवली गेली तर त्यात भारतीय संघ सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमीका बीसीसीआयने घेतली होती. त्यावर जर भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी आले नाही तर भारतात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा संघही सहभागी होणार नाही, असे पाक मंडळाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर अशिया करंडक स्पर्धेसाठी येथे झालेल्या आशिया क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष नजम सेठी व बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक घडली.
वाट्टेल त्या परिस्थितीत भारतीय संघ पाकिस्तानला ही स्पर्धा खेळण्यासाठी जाणार नाही, असे पून्हा एकदा ठणकावून सांगितल्यावर सेठी यांनी शहा यांच्याशी बैठकीतच वाद घातला. अर्थात त्यानंतरही शहा यांनी आपल्या भूमिकेत बदल होणार नसल्याचे सांगितल्यामुळे सेठी यांनाच निराशा सहन करावी लागली.
R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”
स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तानकडे असले तरीही ही स्पर्धा अन्यत्र ठिकाणी हलवण्यात येणार असून नेमकी कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा होणार याचा निर्णय अद्याप लागले नाही. पुढील महिन्यात यावर चर्चा होणार असून त्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील केंद्र सरकारच संघाने तेथे जायचे किंवा कसे यावर निर्णय घेऊ शकते त्यामुळे यावर बैठकीत चर्चा करण्याचे कारणच नाही असे शहा यांनी म्हटले होते. त्यावर सेठी यांनीही संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मात्र, अखेर त्यांनाही नमते घ्यावे लागले आहे.
…तर काही प्रश्न नाही
अबुधाबी, दुबई किंवा शारजात या स्पर्धेचे आयोजन होऊ शकते व तेथे पाकिस्तानशी खेळण्यास भारतीय संघाला कोणतीही अडचण नाही असेही शहा यांनी स्पष्ट केले.