डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेमार्फत होलार समाजाच्या संशोधनाचे काम पूर्ण झाले आहे. संशोधनावर आधारीत अहवाल पूर्ण झाला असून तो अंतिम करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा. विश्वजित कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य रामहरी रुपनवर यांनी होलार समाजाच्या आर्थिक व सामाजिक स्थितीविषयीची लक्षवेधी उपस्थिती केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना कदम बोलत होते. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील होलार जातीची लोकसंख्या एक लाख आठ हजार नऊशे आठ (१,०८,९०८) एवढी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांना भेटी देऊन होलार समाजाच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्याच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
दरम्यान सांगली, बीड, परभणी व सोलापूर जिल्ह्यातील एकूण १३८० कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी दिल्या गेल्या. या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर आधारित वस्तुनिष्ठ पद्धतीने संशोधन अहवाल तयार केला आहे. या अहवालाचे सादरीकरण होलार समाजाच्या ११२ प्रतिनिधीसमोर करण्यात आले. तसेच संशोधनाला गुणात्मक व शास्त्रीय दर्जा प्राप्त होण्याकरिता पुन्हा सामाजिक संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व होलार समाजाचे निवडक प्रतिनिधी अशा एकूण २१ प्रतिनिधींसमोर सादरीकरण करून त्यांच्या अभिप्रायांचा अहवालात समावेश केला असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.