राजकीय विचारांचा कसलाही कौटुंबिक वारसा नाही, कोणी राजकीय वरदहस्त देणारा नेता नाही, अशा पार्श्वभूमीवर केवळ गुणवत्ता आणि सुस्वभाव या बळावर महाविद्यालयातील उत्स्फूर्त आंदोलन ते पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशी वाटचाल. नितीन भामे यांनी केली आहे. अतिशय समंजस नेता, सुस्वभावी आणि मनमिळाऊ संघटक, प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करणारा चिंतक, धडक मारण्याची धडाडी बाळगणारा नेता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे ऍड. नितीन भामे!
पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील जिरायती भागातील भामे कुटुंबीय. या भागात पाचवीला पूजलेला कायमचा दुष्काळ, जिरायत जमिनीत तुटपुंज्या उत्पन्नामुळे गावातील घरटी माणसांना कामानिमित्त परागंदा व्हावे लागे. ऍड. भामे यांचे आजोबा जयसिंग भामे हे नीरा येथील प्रसिद्ध गूळ व्यापारी रावजी हिराचंद कोठडिया यांच्या येथे हमाली करून कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते.
पाच अपत्यांपैकी थोरले रामचंद्र भामे यांचा उपजत बुद्धीमत्ता व शिक्षणाची ओढ असल्याने रामचंद्र यांना बालमित्र अशोक कोठडिया यांचे वडील रावजी कोठाडिया यांनी शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले व पुढे अकरावीपर्यंत नीरा व इंटर सायन्सचे शिक्षण बारामती येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नोकरीनिमित्त सन 1967 साली मुंबईची वाट धरली. मुंबईत पोर्ट ट्रस्टमध्ये काम सुरू केल्यानंतर हे कुटुंब स्थिरावले.
रामचंद्र भामे यांना तीन अपत्ये थोरली मुलगी स्वाती, स्मिता व धाकटा मुलगा नितीन. सर्वांचे बालपण व शिक्षण मुंबईत रमल्याने त्यांना शिस्तीचे धडे मिळाले. नितीन यांचे 9 वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. 1993 मध्ये मुंबईत झालेली दंगल व 12 मार्च रोजीचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर अशांतता व असुरक्षितता निर्माण झालेली होती त्यातच मणक्याचा विकार अधिकच बळावल्याने रामचंद्र भामे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून कुटुंबासह मूळगावी येण्याचा निर्णय घेतला.
भामे कुटुंबीय 1994 मध्ये मावडी व आजोळ वडगाव यांच्या जवळचे म्हणून बारामती शहरात स्थायिक झाले. नितीन भामे यांनी माळेगाव येथे दहावी तर महाविद्यालयीन शिक्षण बारामतीत घेतले. दुकानात काम करत बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. दैनंदिन गरजांसाठी हातातोंडाची गाठ पडत होती. मोठ्या दोन बहिणी होत्या. नितीन यांनी बारामती एमआयडीसीत 50 रुपये रोजंदारीवर तीन वर्षे काम केले. वडिलांच्या आग्रहास्तव नितीन यांनी एलएलबीसाठी विद्या प्रतिष्ठानच्या विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन कायद्याची पदवी संपादन केली.
2005 मध्ये सातारा न्यायालयात नामांकित वकील धैर्यशील ऊर्फ डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस सुरू केली. त्यांच्याकडून राजकीय, सामाजिक विश्वातील बाळकडू मिळाले. ते कॉम्रेड विचारसरणीचे होते. त्यांच्याकडून राजकारणातील आक्रमकता, समयसूचकता आत्मसात केली. प्रॅक्टिसनंतर भामे यांनी 2006 मध्ये बारामती सत्र न्यायालयात काम सुरू केले. त्यावेळी त्यांनी भाजपाचे पूर्णवेळ काम सुरू केले. 2008 पर्यंत भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून काम केले. 2008 ते 2011 पर्यंत बारामती शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी काम केले. बारामतीत भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
अनेक आंदोलने, निवडणुका, पक्षाचे संघटनात्मक कार्यक्रम यासाठी सतत प्रवास, भेटीगाठी यावर भर देत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णक्षमतेने पार पाडण्यात त्यांनी झोकून दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांची संघर्षयात्रा असे कार्यक्रम असोत की ऊस दरवाढीचे आंदोलन असो की पंकजाताई यांच्या नेतृत्वाखालील “यलगार मेळावा’ असो, प्रत्येक वेळी ऍड.नितीन भामे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक नियोजन आणि काम केले आहे. ऍड. भामे यांनी पाच वर्षांत बारामतीसह तालुक्यात अनेक आंदोलने केली. काही आंदोलनाची दखल राज्य पातळीवर घेतली गेली. यादरम्यान त्यांच्यावर 12 गुन्हे दाखल झाले होते. भाजपच्या नेतृत्वाने दखल घेत 2011 मध्ये पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी तर 2013 मध्ये बारामती शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली.
त्यांनी बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व प्रभागात भाजपचे उमेदवार रिंगणात उतरविले. त्यावेळी प्रस्थापितांसमोर अपयश आले. 2018 मध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. 2020 मध्ये पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या सहसंयोजकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली. 2008 ते 2019 या काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून निवडणुकांची धुरा त्यांनी सांभाळली. हे सर्व होत असताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे भामे सांगतात.
2007 मध्ये नितीन भामे अँड असोसिएट फर्म सुरू केले. 2015 मध्ये नवीन इमारतीत कार्यालयाचे स्थलांतर केले. कार्यालयाचे उद्घाटन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते झाले. त्यांच्याकडे 8 ते 10 ज्युनिअर सहकारी वकील काम करीत आहेत. बारामती, दौंड, इंदापूर पंचक्रोशीतील पक्षकार त्यांच्या विविध खटल्यांच्या माध्यमातून कामे घेऊन येतच असतात तसेच 16 वर्षांत त्यांनी अनेक चर्चित तथा संवेदनशील खटल्यात पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे.
राष्ट्रीय प्रश्नांची जाण, कार्यकर्त्यांची मानसिकता लक्षात घेऊन संघटन करण्याचे कौशल्य, आंदोलनाचे समर्थ नेतृत्व करण्याची धडाडी, सर्वसमावेशक व्यापक दृष्टिकोन हे गुण ऍड. भामे यांचे नेतृत्व सिद्ध करणारे आहेत. ऍड. भामे हे असेच एका गावातून राज्य पातळीपर्यंत विकसित होत असलेले नेतृत्व आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
“ती’ भेट अधुरीच…
तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्यांचे राजकीय क्षितीज खऱ्या अर्थाने खुले करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडेसाहेब. त्यांनी ऍड. भामे या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिल्यानेच ऍड. भामे यांचे बारामतीतील राजकीय पटलावर नाव आले. मुंडेसाहेबांशी ऍड. भामे यांचा थेट संबंध, त्यामुळे ऍड. भामे हे मुंडेसाहेबांना राजकीय क्षेत्रातील गुरू मानतात. 13 मे 2014 रोजी मुंडेसाहेब बारामती येथे सभेसाठी आले होते. ते आल्यानंतर विमानतळावरून सभेच्या ठिकाणी नेण्यासाठी पदाधिकाऱ्यांसमवेत ऍड. भामे गेले होते.
त्यावेळी मुंडे साहेब थेट भामे यांच्या गाडीत बसले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. जसा एक मित्र दुसऱ्याशी बोलतो त्याप्रमाणे मुंडे साहेब आणि भामे यांचे संभाषण सुरू झाले. मुंडे साहेब म्हणाले की, एकदा तुझ्या घरी जेवायला येणार आहे, हे वाक्य ऐकताच सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ कशापद्धतीने मुंडेसाहेब जोडतात याचा प्रत्यय ऍड. भामे यांना आला. मात्र, मुंडेसाहेब त्यांचे जून 2014 मध्ये निधन झाले. त्यांचे घरी अगत्य करण्याची संधी भगवंताने ऍड. भामे यांच्या हातून काढून घेतली. याचे शल्य भामे यांच्या मनात आजही घर करून आहे.
कुटुंबासोबतच सहचारिणीची भक्कम साथ
समाजकारणासोबतच राजकारणात ऍड. भामे यांना कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. वडील रामचंद्र भामे, आई पुष्पलता भामे, पत्नी ऍड. शुभांगी भामे, मुलगा ईशान भामे हे भक्कम साथ देत आहेत. तर ऍड. भामे यांचा समाजकारणातील भार हलका करण्यासाठी सहचारिणी ऍड. शुभांगी भामे या देखील कार्यरत आहेत. त्यांनी तेजस्विनी महिला मंचच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले आहे. नवरात्रोत्सव, महाभोंडला, तीळगुळ महोत्सव, हळदी-कुंकू आदी सांस्कृतिक कार्यक्रम ते राबवितात. महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महिलांना समपुदेशन करतात. नवविवाहित जोडप्यांचे कोर्ट प्रकरणे न्यायालयात येण्यापूर्वी त्यांना समपुदेशन करून त्यांचे वैवाहिक आयुष्याची नाळ भक्कम करण्यात ऍड. भामे दाम्पत्य अग्रभागी असतात. त्याचबरोबर सामाजिक जाणिवेतून गरजूंना आर्थिक मदतीचा हात देण्यात ते कधीही हात आखडता घेत नाहीत. महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून असून त्यांना मदतीचा हात ऍड. भामे कुटुंब कायम देत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याबाबतही जागृत
राजकारण, समाजकारण तसेच वकिली व्यवसाय करीत असताना समाजातील नागरिकांच्या आरोग्याबाबत देखील ऍड. भामे जागृत आहेत. नागरिकांचे चांगले आरोग्य लाभावे यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा असून त्याची सवय नागरिकांना व्हावी यासाठी 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत पतंजली आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सव दहीहंडीपुरता मर्यादित नाही
स्व. गोपीनाथ मुंडे दहीहंडी महोत्सवास सन 2015 पासून सुरुवात केली. केवळ दहीहंडीपुरता हा महोत्सव मर्यादित न ठेवता या महोत्सवांतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत. “बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानास गती देण्यात आली. माझी कन्या “भाग्यश्री’ या योजनेअंतर्गत “एक मुलगी’ असलेल्या अनेक दाम्पत्यांचे सत्कार करण्यात आले. दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या टाक्या वाटण्यात आल्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीलादेखील हातभार लावला.
चर्चेतील आंदोलने
2008 महावितरणच्या विरोधात कंदील मोर्चा, आरटीओ कार्यालयावर मोर्चा
2011 सरकारविरोधात गाढव मोर्चा
2013 दुहेरी टोल आकारणी विरोधात मोर्चा
2014 त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचे उद्घाटन पत्रिकेवर नाव नसल्याच्या निषेधार्थ नगर परिषदेविरोधात मोर्चा. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे नाव असलेला फलक नगर परिषदेस भेट
2016 नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर नगर परिषदेला टाळे ठोकले
2018 गणेशमूर्ती विटंबनाप्रकरणी कारवाई न झाल्याने पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या आंदोलन
2020 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत गोविंद बागेसमोर आंदोलन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वंशावळीचा दस्तावेज देत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
2020 साली महाराष्ट्र राज्यातील वकिलांच्या हक्क, कल्याण आणि संरक्षण यासाठी लॉयर्स फोरमच्या माध्यमातून काम.
करोना काळातही उचलला खारीचा वाटा
करोनाच्या वैश्विक महामारीत सामाजिक जाणिवेतून ऍड. नितीन भामे यांनी अनेकांना हातभार लावला. परप्रांतीय कामगार तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी भामे यांनी खारीचा वाटा उचलला. त्यांच्या मदतीने शेकडो परप्रांतीय घरी सुखरूप पोहोचले. ते घरी पोहोचत असताना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली. निवारा केंद्रात देखील अनेकांची सोय केली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात भिलवाडा तसेच बारामती पॅटर्न राबविण्यात आला. या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर नागरिकांसोबत सुयोग्य समन्वय करण्यासाठी प्रभागात समन्वयक नियुक्त केले. त्यामुळे नागरिकांना मोलाची मदत मिळाली.
शब्दांकन – प्रमोद ठोंबरे