जळोची गावातील एका सर्वसाधारण कुटुंबातील चुणचुणीत मुलगा वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सामाजिक आणि धनगर समाजाच्या चळवळीत सहभाग होतो. त्यानंतर त्यांच्यातील परिपक्वतेनंतर एका ध्येयाने प्रेरित होऊन निरपेक्ष समाजभान वृत्तीने ते कार्यरत राहिले. गेल्या 15 वर्षांपासूनचा त्यांचा सामाजिक आणि राजकारणातील प्रवास चित्रपटातील जीवनपटासारखा बहरत गेला आहे. रासपाच्या माध्यमातून त्यांचा सुरू झालेला प्रवास आणि त्यातून घुसमट होत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीत घेतले.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे पक्ष निरीक्षकापासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. पक्षाची संधी शिरसंवाद्य मानून त्यांनी धीरोदत्तपणे लिलया पेलली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने झळाळी आली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मासाळ यांच्यावर सोपवली. मासाळ यांच्या सर्वव्यापी नेतृत्वावर टाकलेला प्रकाशझोत…
किशोर मासाळ हे जळोची गावचे. मेंढ्या पाळणं हा त्यांचा मूळ व्यवसाय. आजोबा, वडील हे मेंढरच राखायचे. मासाळ यांनी मात्र शिक्षणाकडे लक्ष दिले. सातवीपर्यंत जिल्हा परिषदेत शिक्षण घेतले. त्यानंतर आरएनटी या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिकत असतानाच त्यांचे नेतृत्व बहरत गेलं. महादेव जानकर यांच्या भाषणाने प्रभावित होत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात काम करायला सुरुवात केली. 2006 पासून पक्षाचे रासपाचे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम सुरू केले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. संघटना मजबूत केली. 2007 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप प्रश्नी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी महाविद्यालयांनी घ्यायची नाही, असा शासन निर्णय असताना याकडे दुलर्क्ष होत होतं.
हा प्रश्न मासाळ यांनी लावून धरल्याने परिसरातील महाविद्यालयाची त्रेधातिरपिट उडाली होती. या प्रश्नांच्या अनुषंगाने महाविद्यालयांवर केसेस दाखल केलेल्या होत्या. मासाळ यांनी केलेले हे पहिले आणि लक्षवेधी आंदोलन होतं. त्यावेळी त्यांचे वय इतकं कमी होते, त्यावेळी त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता. ज्यावेळी त्यांना मतदानाचा अधिकारी मिळाला. त्यावेळी पंचायत समितीची निवडणूक लढविली. जळोची पंचायत समिती गणातून उभे राहून त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले होते.
त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न लावून धरला. त्यासाठी पाच दिवस उपोषण केले. अजितदादा पवार यांच्या घरात मेंढरे सोडून आंदोलने केली. त्यांच्या सहयोग बंगल्यातील नळकनेक्शन तोडून अजितदादा यांना आव्हान दिले होते. बारामतीत प्रस्थापितांना आव्हान देणारी हीच क्षमता व नेतृत्व त्यावेळी दादांनी हेरली होती. एका व्याख्यानात किशोरसारखा कार्यकर्ता आपल्या पक्षात असायला हवा, अशी भूमिका मांडली. दरम्यान, मासाळ हे ज्या पक्षात कार्यरत होते. त्या पक्षाचे नेतृत्व तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत होते. उपेक्षित माणसाला अपेक्षित ठिकाणी जायचं सोडून ते अपेक्षित ठिकाणी गेले. जानकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांना भेटायला नव्हते, जुमानत नव्हते. त्यामुळे मासाळ यांनी 16 जानेवारी 2018 राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शरद पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार यांच्या बरोबरीने बारामतीत व्यासपीठावर भाषण करायला मला संधी दिली. हा मी माझा सर्वोच्च मान समजतो.’ असे मासाळ हे अभिमानाने सांगतात.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशानंतर मासाळ यांची कारकिर्द बहरत गेली. 17 मार्चला युवक राष्ट्रवादी उपाध्यक्षपद दिलं. त्यानंतर 31 मे रोजी चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांची सभा उधळून लावली. 2014 ला धनगर समाजाला आरक्षण देतो, असे तत्कालीन सरकारने आश्वासन दिलं होते. ते पूर्ण न झाल्याने जाब विचारला तर आमची धरपकड करण्यात आली. जामखेडच्या जेलमध्ये मासाळ एक महिना होते. जामीन होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले गेले. छळ करण्यात आला. तर अजितदादांनी हा विषय नागपूरच्या अधिवेशनात तारांकित विषय म्हणून मांडला. त्यानंतर एक महिन्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली.
चौंडी येथील आंदोलनातून मासाळ यांनी ताकद दाखवून दिली. अजितदादांनी विश्वास दाखवत त्यांना कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षकपदाची संधी देत सर्व मतदारसंघ मासाळ यांच्या ताब्यात दिला. विशेषत: राष्ट्रवादी पक्षाचे प्रत्येक मतदारसंघात जे निरीक्षक आहेत. ते सर्व माजी आमदार आहेत. आमदार नसतानाही निरीक्षक झालेले मासाळ एकमेव आहेत. मासाळ यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत 112 आंदोलने केली आहेत. त्यातील अलीकडचे सर्वांत गाजलेले आंदोलन म्हणजे तत्कालीन समाजकल्याणमंत्री राम शिंदे यांच्या घरात मेंढरे सोडण्याचे हे आंदोलन आहे.
2018 ते 2020 या कालावधीत मासाळ यांनी राष्ट्रवादीत व्यापक पद्धतीने काम केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवाराला 80 हजार मते मिळत होती. मात्र, भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना 2019मध्ये 29 हजार मतांवरच समाधान मानावे लागले. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. मासाळ यांनी बारामती मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्यांना संघटीत करून नियोजन केले होते. तर कर्जत-जामखेड कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षकपदा मासाळ यांच्याकडे असल्याने त्यांनी 2019 मध्ये बारामतीसारखेच काम कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात केल्याने आमदार रोहित पवार यांनी प्रस्थापित आणि 10 वर्षे आमदार आणि 12 खात्यांचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा 43 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे मासाळ यांचे राज्यव्यापी नेतृत्व अधिकच बहरले आहे.
लक्षवेधी आणि आक्रमक आंदोलन
2008 -विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप देत नसल्यावरून समाजकल्याण कार्यालय फोडले.
2013 -अजित पवार यांच्या विरोधात एफआरपीसाठी
शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढला.
मधुकर पिचड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची
अंत्ययात्रा काढली. 25 कार्यकर्त्यांसाठी 1500 पोलीस
तैनात करण्यात आले होत.
2014 -धनगर आरक्षण आंदोलन. अजितदादांच्या सहयोग
निवासस्थानात मेंढरे घुसवली.
2015 -अजितदादांच्या सहयोग
बंगल्याचे नळकनेक्शन तोडले.
2018 -धनगर आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांना
बकरं कापून जेवण घातलं.
2018 -तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा घरी मेंढरे बांधली
2018-भाजप- शिवसेना युतीच्या कार्यकाळात
बेरोजगारांचे आंदोलन
मान- सन्मान
2018-लोणावळा येथे
ओबीसीरत्न पुरस्कार प्रदान
2018 -नांदेड येथे समाजरत्न पुरस्कार
किशोर मासाळ अणि निवडणुका
2012-पंचायत समिती निवडणूक :
जळोची गाव
2013-नगरपालिका
निवडणूक
सपत्नीक लढवली
2016-नगरपालिका
निवडणूक सपत्नीक
लढवली.
ताकद देणारा नेता :
किशोर मासाळ अजितदादांबद्दल भरभरून बोलताना ते म्हणतात, एखाद्या कार्यकर्त्यांला चांगला गुण दिसला की अजितदादा त्याला बळ देतात. अजितदादा हे कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता आहे. राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांना अजितदादांनी ताकद दिली आहे. मी जामखेडला कारागृहात असताना बारामतीतून दररोज मला जेवणाचा डबा मिळेल, अशी व्यवस्था त्यांनी केली होती. एकेकाळी त्यांच्या रागाला पात्र असणारा सर्वसामान्य माणूस म्हणून मला त्यांनी जीव लावला. भविष्यात त्यांच्यावर आमची निष्ठा आहे. महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री होण्यासाठी असणारे खंबीर नेतृत्वाचे गुण दादांमध्ये आहेत, असे मासाळ अभिमानाने सांगतात.
बॅनरबाजी आणि वाढदिवसापासून दूर असलेला नेता :
वाढदिवसानिमित्त कोणतेही निमित्त अलिकडचुया युवक कार्यकर्त्यांना पुरतं. पण मासाळ यांना अशा पद्धतीची कोणतीही बॅनरबाजी पटली नाही. ते कधीही कोणताही बॅनर स्वत: लावत नाहीत किंवा लावूही देत नाहीत. बॅनरबाजीपासून दूर असलेल्या या नेत्याचा आदर्श युवा पिढीने घ्यायला हवा. सध्या राजकीय साठमारीत प्रसिद्धीपासून आणि पोस्टबाजीपासून अलिप्त असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
कार्यकर्त्यांच्या पोटाकडेही नेत्यांनी लक्ष द्यावे :
प्रत्येक कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा असतात. त्या प्रत्येकजण पूर्ण करू शकेलच असे नाही. पण नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पोटाकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या कार्यकर्त्याने तळमजला बांधायला मदत केली, त्याला नेत्यांनी कधीही विसरू नये, असं सांगत मासाळ यांनी महादेव जानकर यांना टोला लगावला. सत्ता, संपत्ती कायम राहणार नाही. त्यामुळे आपली जिवाभावाची माणसं जपली पाहिजेत, ही गोष्ट मी पाळतो.
शब्दांकन – प्रमोद ठोंबरे