जळोची(प्रतिनिधी) :- शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने पुढील काही दिवस कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार दिनांक १६ जुलै ते २३ जुलै दरम्यान पूर्णतः बंद असणार आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अल्पावधी काळाकरिता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांंसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
“कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बारामती शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
-नारायण शिरगावकर -(उपविभागीय पोलिस अधिकारी)
बारामती शहरातील चौ-बाजूच्या सीमा बॅरिकेटने बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
शहराच्या हद्दीत कोठेही गर्दी होणार नाही. तसेच विनाकारण कोणी फिरणार नाही. याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष असणार आहे. यासाठी १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरीक्षक, १० पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी, ७० होमगार्ड, २ (आर.सी.पी.पथक) लॉकडाउनच्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.