माळेगाव – बारामती हे विकासाचे रोडमॉडेल म्हणून ओळखले जाते. बारामतीच्या विकासाबाबत आजवर अनेक दिग्गजांनी तसे बोलूनही दाखवले आहे. ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पवार कुंटुंबीयांनी बारामती परिसराचा विकास केला आहे. हे पाहण्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल, अशी इच्छा सिनेअभिनेते अमीर खान यांनी बोलून दाखविली.
बारामती येथील ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी खान बोलत होते. ते म्हणाले की, पाणी फाउंडेशनच्या वतीने आम्ही ठिकठिकाणीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. गेल्या चार वर्षांपासून पाणी व्यवस्थापनासंदर्भात लोकांना माहिती देत आहोत.
यापुढे पाण्याच्या नियोजना बरोबरच पीक नियोजन, जमिनीचे आरोग्य, गवत लागवड क्षेत्र निर्माण करणे, रिफॉरेस्ट्रेशन या पाच बाबींवर काम करणार आहे. या कार्यक्रमाला मी येथे बोलण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी आलो आहे. त्यासाठी तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल, ग्रामीण भागातील विविध प्रश्नांच्या संदर्भात शरद पवारांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्या सोडवण्याची धमक असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामती येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कृषिप्रदर्शनाला मागील दोन तीन वर्षांपासून येण्याचा माझा मानस होता. याठिकाणी येऊन खूप काही शिकाव अशी माझी इच्छा होती.
अमीर खान, सिनेअभिनेते