पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामतीची लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही गावकी- भावकीची निवडणूक नाही. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. विनाकारण त्यात भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित पुण्यातील सभेत ते बोलत होते. या वेळी प्रमुख नेत्यांसह आमदार दत्तात्रय भरणे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राहुल कुल, माजी खासदार प्रदीप रावत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, कांचन कुल, विकास महात्मे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील कुलदीप कोंडे-देशमुख यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. निवडणुका झाल्यानंतर एकत्र येण्याच्या गप्पा मारल्या जात असून, ही केवळ बनवाबनवी आहे. त्यामुळे भावनिकता व खोट्या प्रचाराला साद देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मत खणखणीत द्या अन् काम वाजवून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
बारामतीत अजित पवार यांनीच विकासाची किमया आणली आहे. महायुतीने उमेदवारी देत विश्वास दाखविला असून, तो सार्थ ठरविणार आहे. आता वेळ बदलली असली, तरी घड्याळ मात्र तेच आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
सूनबाईला पाठवा दिल्लीत अन् लेकीला पाठवा गल्लीत, अशा घोषणा देण्याचा आग्रह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी धरला. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास आपल्या काव्यमय शैलीत भाषण केले. सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातल्याच असल्याने त्यांना बाहेरच्या म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
मैत्रीत अंतर पडू न देण्याची शिवतारेंची भूमिका
बारामतीमधून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. महायुतीच्या सभेला शिवतारे आवर्जून उपस्थित होते. विरोधक किंवा मित्र कसा असावा, हे शिवतारे यांच्याकडे बघून आपण शिकायला हवे. एकदा मैत्री केली, की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण मैत्रीला अंतर पडू देत नाहीत, असे काम विजय शिवतारे यांचे असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
हक्काचे पाणी हिरावून घेणार नाही
अजित पवार यांनी भाषणात बारामती, इंदापूर, दौंडच्या पाण्याचा मुद्दा मांडला. गुंजवणीचे पाणी आणणार. कर्नाटकाला वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंडमध्ये आणणार, असे अजित पवार म्हणाले. बैठकीचा संदर्भ देताना जलसंपदामंत्री म्हणून त्यांनी चुकून जयंत पाटील यांचेच नाव घेतले.
जलसंपदामंत्री या नात्याने जयंत पाटील असे अजित पवार म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. स्वत: अजित पवारही भाषण थांबवून हसू लागले. नंतर त्यांनी चूक सुधारत देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. आता भोर- वेल्ह्याला विरोधक सांगताहेत बघा तुमचं पाणी चाललंय, असे अजित पवार म्हणाले. जनतेच्या तोंडाचा घास, पाणी, हक्क हिरावून घेतले जाणार नाही. भोर- वेल्ह्याचे पाणी त्यांनाच मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.