तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर 150 कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता
बारामती – संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत बारामती शहर चकाचक झाले. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने 150 कर्मचारी व 25 वाहनांच्या ताफ्यासह प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविली. यंदाच्या वारीत प्लॅस्टिक बंदीचा परिणाम जाणवला. परिणामी प्लॅस्टिक कचऱ्याचे संकट टळले.
बारामती शहरात संत तुकाराम महाराज संत सोपानकाका महाराज पालखी सोहळे मुक्कामी असतात. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटोपून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळा शहरात मुक्कामी असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हा कचरा काही तासांच्या आत साफ केला जातो. बारामती शहरात पालखीचे आगमन झाल्यानंतर शारदानगर नेते मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचेपर्यंत ज्या मार्गावरून पालखी शहरात आली त्या मार्गावरील स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत सर्व साफसफाई करण्यात आली. पालखीच्या आगमनाच्या आधी स्वच्छतागृहांची साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
पालखी सोहळ्या दरम्यान निर्माण झालेल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा बायोगॅस प्रकल्पासाठी व सुका कचरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गांडूळ खत निर्मितीसाठी वापरण्यात आला आहे. नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामी 150 कर्मचारी व 25 वाहनांचा ताफा सज्जन ठेवला होता. कर्मचाऱ्यांचे 20 गट तयार करण्यात आले होते. पालखीच्या आगमनापासून ते दुसऱ्या दिवशी पालखी मार्गस्थ होईपर्यंत या 20 गटांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली. मुक्कामाच्या दिवशी दीड तास तर पालखी मार्गस्थ झाल्यानंतर केवळ दोन तासांत चकाचक करण्याचे काम नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने केले.
बारामती शहरात संत तुकाराम महाराज संत सोपान काका व संत संतराज महाराजांच्या पालखी मुक्कामी असतात. पालखी सोहळ्यातील स्वच्छतेची जबाबदारी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे असते. स्वच्छतेच्या दृष्टीने विविध उपाय योजना केल्या जातात. पूर्वनियोजन असल्याने पालखी आगमन व मार्गस्थ झाल्यानंतर काही तासांतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना माध्यमातून बारामती स्वच्छ केली जाते. विविध संस्था तसेच मंडळांच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेसाठी प्लॅस्टिकचा वापर करणे टाळले त्यामुळे प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती होत असल्याचे
दिसून आले.
– सुभाष नारखेडे, आरोग्य निरीक्षक, बारामती नगरपरिषद
मुक्काम संपवून पालखी मार्गस्थ झाल्यानंतर काही तासांत बारामती चकाचक करण्याचा पायंडा बारामती शहरात निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. नगरपरिषदेने कर्मचाऱ्यांचे संख्याबळ पुरवल्याने हे शक्य होत आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात प्लॅस्टिक कचऱ्याचा वापर कमी प्रमाणात झाला. प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या निर्माण झाली नाही. प्लॅस्टिक बंदीचा प्रभाव यावेळी दिसून आला.
– राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक, बारामती नगरपरिषद