नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आपले मत मांडत चिंता व्यक्त केली.ओबामा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याला भारताकडून उत्तर देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयवार आपली तिखट प्रतिक्रिया दिली.
बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना निर्मला सीतारामन यांनी, ‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी (बराक ओबामा) भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्य करणं, हे आश्चर्यकारक आहे असे म्हणत सीतारामन यांनी ओबामा यांच्या वक्तव्यावर नाराजी जाहीर केली आहे,
#WATCH | FM Nirmala Sitharaman says, "…It was surprising that when PM was visiting the US, a former US President (Barack Obama) was making a statement on Indian Muslims…I am speaking with caution, we want a good friendship with the US. But comments come from there on India's… pic.twitter.com/6uyC3cikBi
— ANI (@ANI) June 25, 2023
पुढे बोलताना निर्मला सीतारामन यांनी, “मी अत्यंत जबाबदारपणे बोलत आहे. आम्हाला अमेरिकेशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पण कदाचित त्यांच्यामुळेच (ओबामा) सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले होते. तरीही ते भारतातील धार्मिक सहिष्णुतेवर टिप्पण्या करत आहेत. ओबामांच्या कार्यकालात सीरिया ते येमेन आणि सौदी अरेबिया ते इराक अशा देशांवर बॉम्बस्फोट झाले नाहीत का? तेव्हा सात देशांमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या देशांत सुमारे २६ हजार बॉम्ब टाकले होते. असे नेते (बराक ओबामा) जेव्हा भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर भाष्य करतात, तेव्हा त्यांना कोण गांभीर्यानं घेणार?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर लगेचच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची एक मुलाखत एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली. ज्यामध्ये ओबामा म्हणाले की, त्यांना जर मोदींशी चर्चा करण्याची संधी मिळाली तर ते भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांच्या हक्कांवर चर्चा करतील. मुस्लिमांचे मानवी अधिकार संरक्षित करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलत आहात, असं मी मोदींना विचारेन, असे ओबामांनी म्हटले होते.
पुढे त्यांनी “माझं जर मोदींशी संभाषण झालं, तर माझ्या युक्तिवादाचा एक भाग असा असेल की, जर तुम्ही (मोदींनी) भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण केलं नाही, तर येत्या काळात भारताचे तुकडे व्हायला सुरुवात होईल, अशी दाट शक्यता आहे. देशाच्या अंतर्गत जेव्हा असे मोठे संघर्ष निर्माण होतात, तेव्हा काय होतं, ते आम्ही पाहिलं आहे. हे नक्कीच भारताच्या हिताचं नसेल,” असे बराक ओबामा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.