बारामती – राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद यांच्यावर टीका केली होती. ‘एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असं कसं चालेल?’ असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेते शरद पवार म्हणाले की, “मी कधी मुत्सद्देगिरी केली? ते त्यांनी सांगावं. १९७७ साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते. मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत.”
याशिवाय राष्ट्रवादी फक्त ओबीसींना दाखवण्यापुरते पदे देत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता. यावरही पवार यांनी फडणवीसांना फटकारले आहे. “फडणवीस यांनी पुन्हा आपलं अज्ञान दाखवलं आहे. राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर मधुकर पिचड आणि सुनील तटकरेही अध्यक्ष झाले. हे सगळे कोण आहेत? हे सर्व नेते ओबीसी आहेत. ही सर्व यादी पाहिली तर फडणवीस यांचं वाचन किती आहे माहीत नाही. पण ते या गोष्टींची नोंद न घेता ते विधान करत आहेत. त्यांनी जो प्रश्न विचारला तो वास्तवतेला धरून नाही,” असे शरद पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?
चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना फक्त दाखवण्यासाठी पदे दिली जातात, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली होती.