नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस बॅंका चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला आहे. चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्याने बॅंकेचे कामकाज सलग चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 10 सरकारी बॅंकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारने 10 बॅंकांचे विलिनिकरण करून 4 मोठ्या बॅंका करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही बॅंक कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाऊ शकतात, असे बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सांगण्यात आले आहे. कामाचा आठवडा सहा ऐवजी पाच दिवसांचा करण्याची मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे. ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बॅंक आफिसर्स असोसिएशन , इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स कॉंग्रेस आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बॅंक ऑफिसर्स या संघटनांनी संपाची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात आणि आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एसआयबीओसी चंदीगडचे महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी दिली. सरकारी बॅंका संपावर जाणार असल्या तरी खासगी बॅंकांचे कामकाज सुरू राहणार आहे.