आजचा बांगलादेश हा बदललेला, विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा देश आहे. दक्षिण आशियाई शेजारी देशांची अर्थव्यवस्था धिमी असताना बांगलादेश मात्र विक्रमी वाढीचा दर पार करीत आहे. सध्या बहुतेक देश आत डोकावून पहात आहेत, दरवाजे बंद करीत आहेत. अशा वेळी बांगलादेश व्यवसायासाठी आपले दरवाजे उप्पडे ठेवून पाहुण्यांचे स्वागत करतो.जागतिक आर्थिक मंच (आयएमएम) ने बांगला देशचा उल्लेख “रॉकेटिंग अर्थव्यवस्था’ असे केले आहे. स्टॅनचार्ट बॅंकेनुसार 2030 पर्यंत बांगलादेश हा भारतापेक्षा अधिक श्रीमंत होणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला महत्त्वाच्या क्षेत्रात मागे टाकले आहे. आर्थिक प्रगतीचा वेग असाच राहिला तर तो भारतालाही मागे टाकू शकेल.
1970 च्या दशकात बांगलादेश म्हणजे गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या पुराने वेढलेला देश, हे चित्र भारतीयांपुढे होते. त्यातच 1971 च्या बांगला स्वातंत्र्य संग्रामात अनेक बांगलादेशी भारतात आश्रयास आले. आजही आसाम आणि बंगालमध्ये बहुसंख्येने बांगलादेशी राहत आहेत. स्थानिक नागरिक त्यांच्याविरुद्ध लढत आहेत. भारतीयांच्यात बांगलादेशीयांची प्रतिमा गरीब, आश्रयार्थी अशी आहे. त्यातच भारताच्या गृहराज्यमंत्र्यानी लोकसभेत केलेल्या पुढील वक्त्यव्याने बांगलादेशची प्रतिभा अधिकच डागाळली. मंत्री म्हणाले, जर भारताने उदार भावनेने नागरिकत्व देण्याचे धोरण अवलंबिले तर अर्धा बांगला देश खाली होईल.
वास्तविक, आजचा बांगलादेश हा बदललेला, विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा देश आहे. दक्षिण आशियाई शेजारी देशांची अर्थव्यवस्था धीमी असताना बांगलादेश मात्र विक्रमी वाढीचा दर पार करीत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार विवादामुळे जागतिक बाजारपेठा स्थिर झाल्या आहेत. प्रस्थापितांना धोका पोहचला आहे. गेल्या सहामाहित दक्षिण आशियातील देशांची अंदाजे वार्षिक वाढ 1.1 टक्क्यांनी कमी झाली, तर दुसरीकडे बांगलादेशाने या परिस्थितीला संधी समजून आर्थिक विकासाची प्रभावी नोंद कायम ठेवली. अशा विकसित बांगलादेशची कथा पुढे मांडली आहे.
आशियाई विकास बॅंकेनुसार बांगलादेशाची अर्थव्यवस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. या देशाचा जीडीपी दोन अंकी वार्षिक वाढीवर बंद होत आहे. बांगलादेशने निर्यातीसाठी नविन बाजारपेठा शोधून, मोठ्या संख्येने परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून विविध अत्याधुनिक प्रकल्पांत गुंतवणूक केली आहे. सध्या बहुतेक देश आत डोकावून पहात आहेत, दरवाजे बंद करीत आहेत. अशा वेळी बांगलादेश व्यवसायासाठी आपले दरवाजे उप्पडे ठेवून पाहुण्यांचे स्वागत करतो. 2009 पासून बांगलादेशची अर्थव्यवस्था 2019 पर्यंत 188 टक्क्यांनी वाढली. 2019 साली वार्षिक जीडीपी 8.1 टक्क्यांनी वाढला. 2018 साली तो 7.9 टक्के होता. भारत गेली 2-3 वर्षे 8 टक्के प्रगतीचा वेग साध्याचा प्रयत्न करीत आहे. पण तो प्रत्यक्षात 5 ते 6 टक्क्यावरच आहे. भारत-पाकिस्तान आणि श्रीलंकेसह आणि आशीयाई देशांना जागतिक मंदीचा फटका बसला. तरीही बांगलादेशची भरभराट सुरू आहे. एचएसबी बॅंकेने अलीकडेच अंदाज व्यक्त केला आहे की 2030 पर्यंत बांगलादेशची अर्थव्यवस्था जगातील 26 व्या क्रमांकाची होईल.
बांगलादेशकडे 30 दशलक्ष मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय ही देशांतर्गत ग्राहकपेठ आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश हा चीन-भारत आणि दक्षिण पूर्व आशियाई देशासाठी आर्थिक केंद्रबिंदू होऊ शकतो. त्यामुळे देशी 162 दशलक्ष नागरिकाबरोबरच जवळजवळ 3 अब्ज लोकांचे विस्तारीत मार्केट होऊ शकतो. बांगलादेशची 2019 ची निर्यात 1 अब्ज होती आणि हा आकडा 5 अब्जावर नेण्याचा सरकारचा निर्धार आहे. निर्यातवाढ ही वैविध्यपूर्ण आहे. 2018 मध्ये ती 4.5 टक्क्यांनी वाढली तर पुढील वर्षी 10.1 टक्क्यांची वाढ. रेडिमेड कपड्यांचा उद्योग हा बांगलादेशचा आर्थिक कणा. अमेरिकेतून बांगलादेशी कपड्यांच्या मागणीत वाढ होत आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत आणि चीन मधील नविन बाजारपेठेतील मागणीमुळे 2018 मध्ये कपडा निर्यातीत 2.7 टक्के वाढ झाली; तर 2019 मध्ये 11.5 टक्के. कपड्याशिवाय बांगला देशने द. कोरियाला 12 औद्योगिक रोबोट पुरवले. भारताला चार जहाजे आणि रिलायन्सला रेफ्रिजरेटर्स.
कल्पकता, संधीचा फायदा आणि आधुनिकरण यामुळे बांगलादेशाला जागतिक बाजारपेठेतील
स्पर्धेला तोंड देता आले. जागतिक बॅंकेचे अर्थशास्त्राज्ञ हंस टिमर म्हणाले की, सर्वसाधारणपणे आम्ही अभ्यासलेल्या आकडेवारीतून दिसून येते की बांगला देश शेजारी देश विशेषत: भारत, श्रीलंका, आणि पाकिस्तानपेक्षा चांगले काम करीत आहे. औद्योगिक उत्पादन आणि निर्यातक्षेत्रात. हे आम्ही नोंदले.”
बांगलादेश आपल्या तरूण कर्मचाऱ्यांची शक्ती आणि उत्पादकता देशविकासासाठी उपयोगात आणत आहे. प्रतिवर्षी 65,000 हून अधिक पदवीधरांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेतले. बांगलादेश हा काही शतके ग्रामीण आणि कृषीप्रधान देश होता.
आज व्यावसायिक, शहरी आणि डिजिटल जाणकरांचा देश झाला आहे. हे संक्रमण सुक्ष्म करण्यासाठी देशभरात 8,000 हून आधिक डिजिटल सेंटर उभारली आहेत. त्या सेंटरमधून नागरिकांना विविध डिजिटल सेवा दिल्या जात आहेत. तसेच इंटरनेट आणि मोबाइल कव्हरेजचा विस्तार केला जात आहे. 110 दशलक्षहून अधिक बांगलादेशी नागरिक इंटरनेटचा वापर करीत आहेत. मायक्रो फायनान्स आणि संगणक क्षेत्रे देशाच्या जीडीपीत 53 टक्के भर घालत आहेत. बांगलादेशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 6 लाख “फ्रिलान्सर’ म्हणून कार्यरत आहेत. बांगलादेशचे शहरीकरण वेगाने होत आहे. 2030 पर्यंत 40 टक्के जनता शहरात असेल. हे शहरी लोक अधिक शिक्षित, चपळ, स्मार्ट, उत्साही आणि डिजिटली जोडलेले असल्याने नवनविन कल्पनांच्या साहाय्याने देशाच्या संपत्तीत भर घालू शकतील. “तंत्रज्ञान हे सामान्यांच्या प्रगतीला पोषक असेल आणि त्याआधारे समोरची आव्हाने पेलता येतील’ या धोरणानुसार 2009 पासून शासनाने तळागाळातील लोकापर्यंत 100 टक्के माहिती तंत्रज्ञानाची उपलब्धता देण्याचा प्रयत्न आहे.
आज बांगलादेश जगात पाचव्या क्रमांकाचा इंटरनेट वापरणाऱ्या लोकांचा आशिया पॅसिफिक परिसरातील देश आहे. बांगलादेश रोखीच्या व्यवहारातून मुक्त असा समाज घडवित आहे. गतवर्षी तेथे ई-कॉमर्स मधील व्यवहार 260 दशलक्ष झाले. बांगलादेश 100 एसइझेड (विशेष सवलतीचे प्रकल्प) उभारीत आहे, जेथे सर्व सेवा मिळू शकतील. बांगलादेश हा कृषिप्रधान देश, पण आता कृषी हे निर्वाहपूर्तीच साधन राहिले नाही. आज बांगलादेश स्वयंपूर्ण असून जगात चौथा तांदूळ उत्पादक, दुसरा ज्यूट उत्पादक, आंबा निर्यातीत चौथ्या क्रमांकावर, भाजी निर्यातीत पाचव्या क्रमांकावर आणि मासेमारी क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर आहे. शिवाय महत्त्वाच्या पिकांचे आणि फळांचे जिनोम डिकोडिंगद्वारे उत्पन्न वाढीवर संशोधन, प्रयोगही सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारानी बांगलादेशच्या प्रगतीची योग्य दखल घेतली आहे. 2018 पासून परकीय गुंतवणूकीत 42.9 टक्क्यांनी वाढ झाली. मुख्यत: वीज, अन्य, वस्त्र उत्पादन क्षेत्रात गुंवणूक आली. चीन, इंग्लंड, नेदरलॅंडस, कोरियातून गुंतवणूकदार येतात. सौदी अरेबिया 6,600 मेगॉवॅट गॅसचलित प्रकल्प उभारत आहे. बांगलादेशच्या वाढत्या आकर्षणाचा हा पुरावा आहे. आर्थिक आघाडीबरोबरच बांगलादेशने आरोग्य, शिक्षण या मूलभूत क्षेत्रातही भरीव प्रगती केली आहे आणि याची नोंद युनो आणि आंतरराष्ट्रीय संस्थानी घेतली आहे. काही बाबतीत बांगलादेश भारतापेक्षा वरचढ ठरत आहे.
उदाहरणार्थ
1) जीवमर्यादा पुरुष आणि स्त्रीसाठी. बांगलादेशामध्ये 71 वर्षे आणि 74 वर्षे तर भारतात 67 आणि 70 वर्षे.
2) जन्मजात (नियोनॅटल) मृत्यू प्रमाण भारतात 22.73 प्रत्येक 1,000 जीवीत बालकामागे तर बांगलादेशात 17.12.
3) बालमूत्यू (1 वर्षावरील मृत्यू प्रमाण) 29.94 दर हजारी तर बांगलादेशात 25.14
4) 5 वर्षावरील मृत्यू प्रमाण 38.69 दर हजारी भारतात तर 30.16 बांगला देशात.
5) बांगलादेशात स्त्रियांचे लेबर पार्टिसिपेशन 30 टक्के आणि हे प्रमाण वाढत आहे, उलट भारतात 23 टक्के असून, गेल्या शतकात 8 टक्क्यानी कमी झाले आहे.
वरील बाबी सीमेपलिकडे आपणांपेक्षा चांगल्या गोष्टी घडत आहेत, हे सुचवितात. म्हणूनच बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हटले आहे. “”काही भारतीय बांगलादेशमध्ये विना परवानगी आर्थिक फायद्यासाठी येत आहेत.” जवळपास 50 वर्षांपूर्वी बांगलादेशने भारताच्या मदतीने पाकिस्तानबरोबर युद्ध करून स्वातंत्र्य मिळविले. या स्वातंत्र्याने देशाला संजिवनी, स्थैर्य मिळाले. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती करून आंतरराष्ट्रीय मंचावर सुधारित निर्देशांकाद्वारे प्रगती जगाला दाखवून दिली. बांगलादेशने पाकिस्तानला महत्त्वाच्या क्षेत्रात मागे टाकले आहे. आणि बांगलादेशचा आर्थिक प्रगतीचा वेग असाच राहीला तर भारतालाही मागे टाकू शकेल.
डॉ. अरविंद कुलकर्णी