नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची दिल्लीऐवजी कोलकाता येथे चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती यूयू ललित, एस रवींद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, चौकशीपूर्वी ईडीने या दाम्पत्याला किमान 24 तास अगोदर नोटीस दिली पाहिजे आणि त्याच वेळी पोलिस आयुक्त आणि कोलकाता मुख्य सचिव यांना नोटीस बजावली जाईल.
ईडीने कोलकाता येथे बॅनर्जींची चौकशी केल्यास राज्य यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा आणि हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. काही हस्तक्षेप झाल्यास, ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालिन न्यायालयात जावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
बॅनर्जी दाम्पत्याची पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी-लॉंडरिंगच्या प्रकरणात ईडी कडून चौकशी सुरू आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमुलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत.