मुंबई – जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मात्र या दौऱ्यावरून आता त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.
अशातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण राज्याचे कृषीमंत्री चक्क अंधारात नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करत आहेत. असे मत शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलतांना मांडले आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामेही रखडले होते. मंगळवारी पंचनाम्यांना सुरुवात झाली. दुपारी कृषीमंत्री येणार असल्यानं शेतकऱ्यांची गर्दी झाली. सर्वांचे डोळे कृषीमंत्र्यांकडे लागले होते. मात्र, दुपारी येणारे कृषीमंत्री निफाड तालुक्यात येता-येता अंधार पडला. त्यानंतर लगबगीनं कृषीमंत्र्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहाणी केली . यामुळे शेतकऱ्यांना थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधता आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर अब्दुल सत्तार यांनी पाच मिनिटांत द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली, फोटो सेशन केलं असं म्हणत त्यांना ट्रॉल केले जात आहे. मिडियाशी बोलले आणि चहा पिऊन निघून गेले असं म्हणत शेतकऱ्यांकडून कृषिमंत्रांवर टीका केली जात आहे.
तर दुसरीकडे मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की मी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे, ‘अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री म्हणाले आहे.