मेहनतीने कमावलेली पै-न-पै ग्राहक, सभासद एक विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून आपल्या हाती देतात. ग्राहक, सभासदाचे हित जोपासून तो पैसा हाताळताना आपण केवळ एक विश्वस्त आहोत. त्याच भूमिकेची जाणीव आपण सातत्याने राखायला हवी. या शुद्ध भावनेनेच आम्ही भगिनी निवेदिता सहकारी बॅंक आतापर्यंतची वाटचाल करीत आलेलो आहोत.
– स्मिता देशपांडे (मुख्य कार्यकारी अधिकारी भगिनी निवेदिता सहकारी बॅंक, पुणे)
कार्यदक्ष बॅंक अशी वेगळी ओळख
कार्यदक्ष बॅंक अशी आमची एक ओळख, एक ब्रॅंड म्हणून निर्माण झाली आहे. कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेण्यासाठी आलेल्या अर्जदाराच्या प्रस्तावाचा विचार करताना बॅंक ज्या रितीने एकूण प्रक्रिया राबवते, कागदपत्रांची छाननी आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून बॅंक अधिकारी व कर्मचारी स्वतः संबंधित अर्जदाराचे कामाचे ठिकाण, घर, कुटुंबीय वा वेळ पडली तर नातेवाईकांशी संपर्क करून सर्वंकष माहिती घेतात आणि मगच त्या कर्जाविषयीचा निर्णय देतात. यामुळे अर्जदाराची नेमकी गरज, उद्देश व कर्जाविषयीची त्याची निकड लक्षात येते. त्यामुळे कार्यदक्ष बॅंक अशी बॅंकेची ओळख झाली आहे.
सहकारातून समृद्धीकडे हा सहकाराचा मंत्र आहे. मात्र समृद्धीकडे प्रवास करताना पारदर्शक, नियमांच्या चौकटीत राहून चोख व्यवहार हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. वित्तीय सहकार क्षेत्रातील तत्त्वांचा विचार करता सामान्य माणसाचे हित लक्षात घेऊन, त्याला मदतीच्या ठरतील अशा गोष्टी करणे हे खूप महत्त्वाचे ठरते. या आणि अशा गोष्टींनाच प्राधान्य देत एक दोन नव्हे तर सुवर्णमहोत्सवी म्हणजेच पन्नास वर्षांची वाटचालीस सुरुवात करीत भगिनी निवेदिता सहकारी बॅंक सुवर्णभरारी घेते आहे. ही ग्राहक, सभासद, संचालक मंडळी, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
आयुष्यभर मेहनतीने कमावलेली पै-न-पै ग्राहक एक विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून आपल्या हाती देतात. ग्राहक, सभासदाचे हित जोपासून तो पैसा हाताळताना आपण केवळ एक विश्वस्त आहोत. त्याच भूमिकेची जाणीव आपण सातत्याने राखायला हवी. या भावनेनेच आम्ही भगिनी निवेदिता सहकारी बॅंक आतापर्यंतची वाटचाल करीत आलेलो आहोत. हाच आमच्यावर झालेला संस्कार आहे. आणि या संस्काराच्या, कार्य संस्कृतीच्या बळावरच सलग 19 वर्षांपासून अधिक काळ आम्ही झिरो एनपीए, सभासदांना सर्वोत्तम व समाधान देणारा लाभांशाचा दर, सातत्याने ऑडिट संबंधाने अ दर्जा मिळवित आलेलो आहोत. बॅंकेची ही गुणवैशिष्ठ्ये मिळवणे आणि टिकवणे ही अर्थातच आव्हानात्मक प्रक्रिया आहे.
पारदर्शक कार्य संस्कृती
कोणत्याही वित्तीय संस्थेचा विचार केला, त्यातही सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या बॅंकांचा विचार केला तर लक्षात येते की, सभासदांच्या निधितून उभ्या राहिलेल्या संस्थेला आपल्या विविध संकल्पनांच्या जोरावर वाटचाल करावी लागते. ती एका कुटुंबासारखीच असते. बॅंक व्यवस्थित चालवायची तर उत्पन्न चांगले हवे, कर्जे, ठेवी, गुंतवणूक अशा प्रक्रिया हेच वित्तीय संस्थेच्या व्यवसायाचे स्रोत असतात. चांगल्या उत्पन्नासाठी योग्य प्रमाणात कर्जांचे वितरण झाले पाहिजे. त्यातही व्यवसाय करताना ते कर्ज वितरण अशा रितीने होणे अपेक्षित आहे की, त्याची वेळेत परतफेड व्हायला हवी.
कोणत्याही बॅंक व्यवस्थापनासाठी ही तारेवरची कसरत असते. अन्यथा बॅंकांना एका काळानंतर आर्थिक घडी व्यवस्थित व्हावी यासाठी आव्हांनाचा सामना करावा लागतो. या अनुषंगानेच भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेने सुरुवातीपासूनच योग्य रितीने कर्ज वितरण केली आहेत. कोणत्याही स्वरूपातील व कोणाच्याही हस्तक्षेपाविना, भारतीय रिझर्व्ह बॅंक व सहकार क्षेत्रातील नियमांचे पालन करीत व अत्यावश्यक त्या सर्व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी, संबंधित अर्जदाराच्या आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीचा योग्य रितीने अभ्यास करूनच केवळ गुणवत्तेच्या आधारावर कर्जवाटप हा आमचा मानक आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की, नव्हे ती बॅंकेची ओळख आहे. या प्रक्रियेचे आणखी एक वैशिष्टय मी सांगेन की, ही सर्व प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने राबविली जाते.
आज रोजी बॅंकेचे 18 हजारांहून अधिक छोटे- मोठे कर्जदार आहेत. बॅंकेचे अर्थसहाय्य आणि संबंधित व्यक्ती, संस्था, कंपनीची मेहनत यामुळे दोन्ही घटकांची प्रगती साधली जाते आहे. याचा आनंद आहे. नियमांचे काटेकोर पालन केले की, कर्जवसुली संबंधाने नकारात्मक अनुभव येण्याची शक्यता कमी असते असा आमचा अनुभव आहे. नियमांवर बोट ठेवूनच असा व्यवहार, व्यवसाय सांभाळला की, काही अर्जदाराच्या अपेक्षेनुसार न होण्याची, प्रसंगी व्यवसाय गमावण्याची, ग्राहक दुरावण्याची शक्यता असते.
त्या गोष्टींची देखील आम्हाला जाणीव आहेच पण आम्ही तो ग्राहक, अर्जदार दुरावला जाऊ नये आणि नियमांच्या चौकटीतच पण त्यांच्या समस्यांवर उपाय कसा शोधता येईल असाही प्रयत्न करतो. आणि केवळ कर्जाच्याच बाबतीत नव्हे तर एकूण बॅंकिंग व्यवहाराच्या संबंधाने अशा रितीने व्यवहार करणे ही भगिनी निवेदिता बॅंकेची कार्य संस्कृती आहे. ही कार्य संस्कृती बॅंकेच्या स्थापनेपासून रुजवली गेलेली आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.
वित्तीय सर्वसमावेशकता
बॅंकेने सुरुवातीपासूनच फायनान्शियल इन्क्लूजन म्हणजे वित्तीय सर्वसमावेशकता जपली आहे, नव्हे त्याच उद्देशाने बॅंकेची स्थापना झाली आहे. सामान्य माणसे, त्यातही महिला, छोटे व्यावसायिक यांच्या सह नव्या काळातील बचत गटासाठी बॅंकेने अनेक कर्ज योजना, गुंतवणूक योजना, सुविधा आणल्या आहेत. छोट्या खातेदारांसाठी 300 रुपयांत बचत खाते तर 2 हजार रुपयांत चालू खाते (करंट अकाऊंट) सुरू करण्याची सोय आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
बचत गट किंवा कष्टकरी ग्राहकांसाठी म्हणून आम्ही केवळ दहा रूपयांमध्ये तुमचे बचत खाते उघडू शकता अशी सुविधा देऊ केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. पण आमचा आग्रह आहे की, तुम्ही बचत खाते सुरू करा. बचत करायला सुरुवात करा. अर्थसाक्षर बना. अर्थनियोजन करा. यासोबतच पुणे महानगराभोवताली असणाऱ्या ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आम्ही सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त छोट्या रकमेची कर्जयोजना सुरू केली आहे.
जलद व अभ्यासपूर्ण पण सजग निर्णय
कर्ज प्रस्तावांचा विचार असेल, गुंतवणूक योजनांचा विषय असेल व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्व अत्याधुनिक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल बॅंकेने, तज्ज्ञ व अनुभवी संचालक मंडळींनी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निर्णय व कृती वा अंमलबजावणीमध्ये नेहमीच जलद व अभ्यासपूर्ण सजगता बाळगली आहे. हे मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की, बॅंकेने नेहमीच काल सुसंगत असे धोरण स्वीकारले आहे.
काळाची पावले ओळखून योग्य व सर्वंकष निर्णय प्रक्रिया राबवली आहे. आणि विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे झाली आहे. ग्राहकांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण सेवा- सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आवश्यक निर्णय, निधीची उपलब्धता करून दिली जाते. बॅंकेची प्रगती आणि ग्राहकहितासाठी या गोष्टी आवश्यक ठरतात.
आधुनिकतेची कास
काळानुसार व वाढत असलेल्या इंटरनेट वापराने सायबर सुरक्षेसारखी नवी आव्हाने समोर आली आहेत. त्यानुसार आम्ही देखील ग्राहकहित आणि ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षा लक्षात घेवून अनेक गोष्टींमध्ये विशेषतः तंत्रज्ञानामध्ये बदल केले आहेत, करतो आहेत ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे.
ग्राहक जागरूकता
ग्राहक जागरूकतेच्या अनुषंगाने आम्ही वर्षभर सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. ज्यामध्ये ग्राहक, सभासद प्रशिक्षणासोबत वाढत्या सायबर क्राईमच्या अनुषंगाने जनजागृती मेळावा, प्रशिक्षण, अर्थसाक्षरतेच्या उद्देशाने एटीएम, बॅंकिंग ऍप विषयक शंका निरसनासाठी दररोजच्या बॅंकिंग अवर्समध्ये मार्गदर्शन, तसेच डिजिटल बॅंकिंग संबंधाने असणाऱ्या विविध शंकाचे निरसन करण्याचे काम आमचे कर्मचारी सातत्याने करीत असतात.
कार्यदक्ष बॅंक अशी वेगळी ओळख
कार्यदक्ष बॅंक अशी आमची एक ओळख, एक ब्रॅंड म्हणून निर्माण झाली आहे. कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेण्यासाठी आलेल्या अर्जदाराच्या प्रस्तावाचा विचार करताना बॅंक ज्या रितीने एकूण प्रक्रिया राबवते, कागदपत्रांची छाननी करते. आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून बॅंक अधिकारी व कर्मचारी स्वतः संबंधित अर्जदाराचे कामाचे ठिकाण, घर, कुटुंबीय वा वेळ पडली तर नातेवाईकांशी संपर्क करून सर्वंकष माहिती घेतात. आणि मगच त्या कर्जाविषयीचा निर्णय देतात. यामुळे अर्जदाराची नेमकी गरज, उद्देश व कर्जाविषयीची त्याची निकड लक्षात येते. त्यामुळे कार्यदक्ष बॅंक अशी बॅंकेची ओळख झाली आहे.
2001-02 दरम्यान तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा भट यांनी ज्या गोष्टींचा समावेश कर्जमंजूर प्रक्रियेमध्ये केला, त्यात झालेले फायदे लक्षात घेऊन आम्ही आजही ती पद्धत सुरू ठेवली आहे. त्यात काळानुरूप व तंत्रज्ञानाची मदत होणाऱ्या गोष्टी जोडतो आहोत. या प्रक्रियेत किंवा कर्ज वसुलीदरम्यान अनेकवेळा यासंबंधाने काम करणाऱ्या विभागातील महिलांना संबंधित कर्जदार वा त्यांच्या कुटुंबीयांकडून वाईट ऐकून घ्यावे लागते तरीही आमच्या बॅंकेतील सर्व कर्मचारी वर्ग समर्पित वृत्तीने, नेटाने, चोखपणे व सहनशीलतेने काम करत आहेत. त्यासाठी त्यांचे कौतुक करावेच लागेल. हे टीम वर्क आहे. कधी-कधी बॅंकेच्या कार्यपद्धती, उद्दिष्टपूर्तीत आव्हाने निर्माण करतात. पण ग्राहक, सभासदांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत जो प्रवास आम्ही करणार आहोत तो चांगला व यशाकडे नेणारा असेल याचा विश्वास आम्हा सर्वांना आहे. म्हणून अशी वेगळी ओळख आमची अडचण नसून आमचा युनिकनेस बनला आहे.
असे मी म्हणेन. …आणि वेळ ही सांगून येत नसते. पण कर्ज परतफेडीसाठी कर्जदारांना येणाऱ्या अडचणींचा देखील आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतो. ज्या-ज्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थिती, अचानक आलेल्या संकटांमुळे कर्जाची परतफेड ग्राहकांना कठीण वाटते अशा वेळी बॅंक त्यांच्यासोबत असते. कायद्याची सोबत आहेच, पण त्यापेक्षा कठीण प्रसंगात संबंधित कर्जदाराशी संवाद साधून त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी ते काय करू शकतील, अशा उपायांची चर्चा व त्यासाठी मदत आम्ही करतो. त्यातूनच चांगल्या समन्वय आणि संवादातून ही कर्जवसुली पूर्ण होते. असा आमचा अनुभव आहे.
(शब्दांकन : नरेंद्र जोशी)