रमेश जाधव
रांजणी – एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले अन् शिवसेनेत भुंकप झाला. हे बंड एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीच्या रुपाने मोठे फळ मिळवून दिले. याच शिंदे गटात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रवेश केला. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकहितांची कामे मार्गी लावण्यासाठी आढळराव प्रचंड “ऍक्टिव्ह’ झाले असून मुख्यमंत्री शिंदेही ही कमे मार्गी लावण्यासाठी तत्काळ मंजुरी देत असल्याने असंख्य शिवसैनिक आढळराव यांच्या नेतृत्वाखाली शिंदेगटात प्रवेश करीत असल्याने शिंदेगटाला बळ मिळत आहे.
दोन अडीच महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर शिंदे सेना आणि ठाकरे सेना अशी राजकीय फळी निर्माण झाली. महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेची घुसमट होत होती. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत असल्याची तक्रार अनेकदा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली; परंतु कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे ठाकरे यांनी दुर्लक्ष केले हेच दुर्लक्ष शिवसैनिकांना खटकले अन् त्यांनी आढळराव यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटास बळ दिले.
गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना सर्वाधिक त्रास आणि संघर्ष करावा लागला. शिवसेनेच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर झालेल्या आघाडीचा सर्वाधिक फटका शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांनाच बसला.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर विरोधक म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात होते त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेची चांगली पक्ष बांधणी केली होती. कार्यकर्त्यांना देखील त्यांनी चांगल्या प्रकारचे राजकीय बळ दिले होते परंतु महाविकास आघाडी सरकारच्या राज्याच्या सत्तेतील प्रमुख सत्ताधारी राहीलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकीय प्रभावामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली.
आढळरावांना पुन्हा नेतृत्व देण्याचा मानस
शिंदे गटातील शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. शिंदे गटात सामील झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेना शिंदे गटाने साथ देण्याचा निर्णय घेतला असून अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सक्रिय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा आढळराव पाटलांकडे शिरूर लोकसभेचे नेतृत्व देण्याचा मानस व्यक्त केला आहे.