श्रीकांत कात्रे
आर्थिक संकटावर मात करून कुटुंबाला सावरण्यासाठी कष्टाची तयारी ठेवून संघर्ष करणारे यशस्वी होतात. अलका किरूळकर अशाच जिद्दी. लहानपणापासूनच कष्टाची किंमत जाणणाऱ्या. स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडणाऱ्या. आर्थिक स्थिरतेसाठी विविध प्रकारे प्रयत्न करणाऱ्या. आणि अखेर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अलका यांनी खाद्यपदार्थ आणि मसाल्यांच्या व्यवसायात स्वतःचा ब्रॅंन्ड निर्माण केला. स्वतः स्वावलंबी झाल्या. काही इतर महिलांनाही त्यांनी रोजगाराचा आधार दिला…
अलका किरूळकर यांनी शिकत असतानाच दहावीमध्ये शिकवण्या घेऊन स्वावलंबी होण्याची धडपड केली. त्यावेळी शिकवणीची फी मिळायची पाच रुपये, दहा रुपये. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी असे स्वकमाईवर पूर्ण केले. त्यांच्या घरची परिस्थिती अगदीच वाईट नव्हती. परंतु, पैशांची किंमत समजेल, असे वातावरण त्यांना मिळाले. त्यांचे माहेर कोल्हापूरचे. वडील सखाराम पाटील एमएसईबीत काम करत. खूप कष्टाळू. त्यामुळे अलका यांना लहानपणापासून वडलांच्या कष्टाची जाणीव होती. स्वकष्टाने उभे राहण्याची जिद्द त्यांच्या मनात नकळत कोरली गेली.
पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न झाले. पुण्यातील सांगवीमध्ये त्या आल्या. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. इतकी अडचण की अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. मग अलका यांनी त्या परिसरात पुन्हा शिकवण्या सुरू केल्या. योगासनांचे क्लास सुरू केले. पण त्यातूनही खर्च भागत नव्हता. पदार्थ करणे आणि इतरांना खाऊ घालणे हाही त्यांच्या आवडीचा भाग होता. विविध प्रकारचे मसाले त्या चांगल्या करायच्या. मसाले किंवा हेच खाद्यपदार्थ आपण विकू शकतो, अशी कल्पना त्यांच्या मनात चमकून गेली. कल्पना चांगली होती, पण प्रश्न भांडवलाचा होता. अखेर त्यांनी कानातील दागिना विकला आणि व्यवसाय सुरू केला. मसाले तयार करायचे- दहा किंवा वीस रुपयांना विकायचे, असे त्यांनी सुरू केले. घरगुती स्वरूपात व्यवसाय सुरू झाला. त्यात व्यावसायिक दृष्टीकोन नव्हता.
गरज भागत होती, एवढेच. त्या सांगवीतून पिंपळे गुरव या भागात राहयला गेल्या. आपले उत्पादन कसे विकायचे याचा अंदाज येऊ लागला. दारोदारी जाऊन विक्री सुरू केली. अनेकदा अपमान सहन करावा लागला. पण व्यवसाय करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मसाले किंवा खाद्यपदार्थ तयार करायचे, ते दारोदारी फिरून विकायचे. लोकांकडूनच होणाऱ्या तोंडी प्रचारातून व्यवसाय वाढू लागला. विविध प्रकारच्या चकल्या, करंज्या, अनारसे, खाजा, भाकरवडी, चिरोटे, बालुशाही, विविध प्रकारची शंकरपाळी, गोड गुलाबाची फुले, खवा व उकडीचे मोदक,भडंग व चिवड्याचे विविध प्रकार,रवा, मोतीचूर, बुंदी, खोबरे, बेसन, शेंगदाणे असे 40 प्रकारचे लाडू त्या तयार करतात.
माणदेशीच्या धनश्री यांच्याशी संपर्क झाला. धनश्री यांनी उत्पादनाचा दर्जा पाहून मार्केटिंग, ब्रॅंन्ड, पॅकेजिंग यासारख्या पूरक बाबींचे मार्गदर्शन केले. आता स्वतःचा श्री महालक्ष्मी फूडस् म्हणून ब्रॅंन्ड विकसित झाला. दहा- वीस रुपयांपासून विक्री सुरू झाली. आता महिन्याची उलाढाल 45 ते 47 हजारांवर गेली आहे. सुरवातीच्या काळात एकट्या उभ्या राहून अडीचशे- तीनशे चकल्या त्या करायच्या. आता खाद्यपदार्थ बनविण्यासाटी त्यांना चार महिलांची मदत घ्यावी लागते. त्या महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या 15 ऑगस्टला दिघी येथील मातोश्री अनाथाश्रमात 70 अनाथ मुलांना चकली आणि चॉकलेटचे वाटप करून त्यांनी आपल्या ब्रॅंन्डला बाजारपेठेत आणले. मसाले आणि विविध खाद्यपदार्थांना मागणी वाढत असतानाच अलका यांनी कल्पकतेने खाद्यपदार्थांना वेगवेगळी चित्ररुपे देण्याचा प्रयोग अंमलात आणला.
म्हणजेच खाद्यपदार्थांना गुलाबाचे फुल किंवा मोर किंवा टी शर्टसारख्या कपड्याचा आकार देणे, यासारख्या वस्तू किंवा गोष्टींच्या प्रतिकृती असलेल्या खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली. रुखवत, ओटीभरण, गौरी गणपतीपासून दिवाळीपर्यंत विविध सणासुदीला अलका यांच्या पदार्थांनी अनेकाच्या घरात स्थान मिळविले आहे. बाराही महिने त्यांचे उत्पादन सुरू असते व ऑडर्स त्या स्वीकारतात. कष्ट, संघर्ष, रात्रंदिवस जागरण करीत त्यांनी हा व्यवसायाचा डोलारा उभा केलो.
पीठमळणीचे मशीन, लसूण सोलण्याचे मशीन, नारळ खोवणीचे मशीन अशी यंत्रे त्यांनी मदतीला घेतली आहेत. विविध प्रकारचे मसाले, चटण्या तयार करतात. कारल्याची, भेंडीची चटणी आपण कधी ऐकलीही नसेल, पण तीही त्या बनवितात. इतके सारे खाद्यपदार्थ तयार करताना त्या लोकांच्या आरोग्याचाही विचार करतात. कुणाला डायबेटिस आहे, बीपी आहे, याचा विचार करून डाएट पदार्थही त्या करतात. त्यांना व्यवसाय वाढवायचा आहे. त्याचबरोबर एखाद्या अनाथ मुलाचे शिक्षण पूर्ण करून त्याचे करिअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. मोठ्या संघर्षातून जिद्दी अलका यांनी उभारलेला हा व्यवसायाचा वेलू गगनावरी गेला आहे.