चिंबळी – खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी परिसरातील शेतकरी वर्गांने गेल्या दोन महिन्यांपूर्वी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू पिकाची काढणी करून कमीत कमी खर्चात आणि थोड्या अवधित चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे बाजरीचे पीक घेतले असून, आता हे पीक फुलोऱ्यात आले आहे.
चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरात शेतकरी वर्गांनी रब्बी हंगामातील घेतलेल्या पिकाची काढणी करून उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकासह बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. या पिकापासून उत्पन्न भरघोस मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला खतपाणी वेळेवर घातल्याने व खुरापणी करून चांगल्या प्रकारे निगा राखली असल्याने पीक जोमाने येऊन फुलोऱ्यात आले असल्याने शेतकरी समाधानी आहे. मात्र, गेल्या आडवड्यापासून कडक उष्णता आणि काहीअंशी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाचे वातावरण दिसू लागले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.