कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे. आपलं आयुष्यही असंच असतं. आपल्याकडे ज्ञान असूनही अपयशाला सामोरे जावे लागते. काही वेळा त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो तर काही वेळा त्याची किंमत फार मोठी मोजावी लागते. कधीकधी आपला सर्व बाजूंनी विचार करून घेतलेला निर्णय चुकतो. अभ्यास करून सुरू केलेला व्यवसाय फार मोठ्या तोट्यात जातो.
पूर्वी माणसं खेड्यात राहाणं पसंत करत नसत. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शहरात येत. परंतु शहरात जर मनासारखं घडलं नाही तर पश्चाताप करणं एवढंच उरतं. आपल्याला सदैव बहरलेली झाडे बघायची सवय झाली आहे. कारण ती आपल्या डोळ्यांना सुख देतात आणि पानगळ झालेली उघडी बोली झाडे बघायला नको वाटतात. आयुष्यातला बहराचा काळ हवाहवासा वाटतो पुन्हा पुन्हा आठवावा वाटतो. युवा अवस्था ही आयुष्यातला बहराचा काळ म्हणायला हरकत नाही. कारण तेव्हा “लाथ मारीन तिथे पाणी काढू’ अशी वृत्ती असते. थोडेफार अपयश आले तरी सहन करायची धमक असते.
जंगलाचं असे रूप बघवत नाही. फुलांनी बहरलेली झाडं, रंगीबेरंगी फुलं बघायला छान वाटतात, सुखद वाटतात.
बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है
या गाण्यातली सुंदर बाग लगेच डोळ्यासमोर येते. शिशिर ऋतूनंतर पानगळ होते. त्यामुळे कुणालाही आवडत नाही. पानगळ होणं, पानं वाळणं, त्याचा आवाज सगळं नकोसं. शेतीचा बहर शेतकऱ्याला मानसिक समाधान आणि शांतता देतो. हातात चार पैसे खेळतील या विचारानेही सुख वाटतं. नवीन लग्न झाल्यावर काही काळ बहराचा जातो. आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात सणावारामुळे बहर येतो. जरा वेगळा दिवस.
खरंतर आपलं आयुष्य आपणच सतत बहरत ठेवलं पाहिजे. नव्या नव्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे. प्रत्येकाने मनाने सतत युवा असलं पाहिजे. तरच काहीतरी करावंसं वाटतं. जुन्या आठवणी काढणाऱ्याला म्हातारपण आलं, असं म्हणतात.
झाडांनासुद्धा कसं वाटंत असेल पानगळ झाल्यावर. फांद्याचं रक्षण कोण करणार? इतकं प्रखर ऊन कसं सोसवेल. आता हिरवेपणा संपला. निष्पर्ण वृक्ष. केवळ रखरखाट. माणसाचं मात्र तसं नसतं, त्यानं ठरवलं तर काहीही होऊ शकतं. आयुष्य सतत बहरलेले असावं. ओलिताखालील जमीन वर्षभर पिके घेतली तरी ती बहरलेली असते.
“बहरून ये अणु अणु जाहली रोमांचित ही तनू’
असा प्रेमाचा बहरही असतो. लेखक, कवी, खेळाडू यांच्या करियरमध्ये काही वर्षे बहराची असतात. याची जाणीव त्यांनाही असते. लोकसुद्धा म्हणतात अमुक अमुक काळात तो जोशात होता हाच तो बहराचा काळ. या काळात केलेल्या कोणत्याही गोष्टीत यश मिळते.
नीलम ताटके