नवी दिल्ली – अध्यात्मिक गुरू बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री (dhirendra shastri) यांनी नेपाळ मधल्या काठमांडु येथील ओशो तपोवनला भेट दिली आणि या ओशो कम्युनिटीचे संस्थापक स्वामी आनंद अरूण यांची भेट घेतली. यावेळी बागेश्वर बाबांनी ओशो रजनीश यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना सांगितले की ओशो रजनीश यांनी आपल्या क्रांतिकारी शिकवणुकीने आणि ध्यान तंत्राने जगाला वेगळा मार्ग दाखवला पण हे करताना त्यांनी अनेक आव्हाने आणि बदनामीचा सामना केला. जगभरातील आव्हानांना तोंड देऊनही रजनीश ओशोंनी (Osho Rajneesh) ज्या धैर्याने आपली चळवळ यशस्वीपणे सुरू ठेवली त्यापासून आपल्यालाही प्रेरणा मिळाली आहे असे ते म्हणाले.
बागेश्वर बाबा म्हणाले की, मानवी चेतनेच्या उत्क्रांतीच्या प्रवासासाठी दोन महान संत आहेत. एक गोरखनाथ आणि दुसरे ओशो रजनीश.1970 ते 1990 च्या दरम्यान ओशो चळवळ शिखरावर होती, त्यांच्या या चळवळीला अनन्य साधारण महत्वे आहे. कारण ती अधोरेखित करते की ईश्वरी चैतन्य प्राप्त करण्यासाठी भौतिक जगाचा त्याग करण्याची गरज नाही.
ओशो रजनीश हे त्यांच्या काळात एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते, त्यांच्या बोल्ड प्रवचनांमुळे लैंगिक संबंधांना अध्यात्माशी जोडले गेले आहे, आणि त्यांनी पारंपारिक संन्यासांची नवसंन्यास म्हणून पुन्हा ओळख करून दिली आहे, ज्यासाठी संन्याशाला जगाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. रजनीशांनी ईश्वराच्या अस्तित्वाचे खंडन केले आणि असे म्हटले की, देव नाही, फक्त ईश्वरभक्ती आहे. याचा अर्थ असा होता की आत्म्याच्या बाहेर कोणताही देव सापडत नाही. तथापि, स्वतःला भगवान म्हणवून घेत, रजनीश यांनी घोषित केले की आपल्यापैकी प्रत्येकजण स्वत: मध्ये ईश्वरभावना प्राप्त करू शकतो.
भारतातील आणि जगभरातील देवावर श्रद्धा असलेल्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. ओशो चळवळीने त्यांच्या पुण्याच्या आश्रमात तसेच ओरेगॉन राज्यातील भव्य रजनीशपुरम आश्रम या दोन्ही ठिकाणी जगभरातून हजारो भक्त आणि अनुयायांना आकर्षित केले. आपण पुढील तीन महिन्यांत पुन्हा नेपाळला येऊ आणि ओशो तपोबन आश्रमात काही काळ वास्तव्य करू असेही बाबांनी यावेळी सांगितले.