अकोला: अकोट तालुक्यात गारपीटनुकसानग्रस्त पिकांची व फळबागांची पाहणी आज राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.
यावेळी त्यांचे समवेत बाळापुरचे आ. नितीन देशमुख, तहसिलदार राजेश गुरव हे उपस्थित होते.यावेळी त्यांनी कलिंगड, कांदा, संत्रा, लिंबू, केळी उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. रब्बी पिकांचे सरसकट नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले. अकोली जहागिर येथे नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी केली.
त्यानंतर तहसिल कचेरीत ना. कडू यांनी नाफेड मार्फत खरेदी, सीसीआय मार्फत खरेदीप्रक्रियेचा आढावा घेतला. कापूस खरेदीचा वेग वाढवावा, तसेच मका खरेदी व तूर खरेदी बाबतही त्यांनी आढावा घेऊन सुचना दिल्या, अशी माहिती तहसिलदार गुरव यांनी दिली.
चोहट्टा बाजार आणि अकोली येथील मद्यविक्री दुकाने बंद
अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार आणि अकोली जहागीर येथील देशी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले. या दुकानांत मद्य परवाना न घेता मद्यविक्री होत होती. स्वतः पालकमंत्री ना. कडू दुकानांची पाहणी केली. त्यावेळी दुकानातील अनियमितता दिसून आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी कारवाई करुन दुकानातील विक्री थांबवली व प्रकरण नोंदवून या संदर्भातील प्रकरण सुनावणीसाठी दाखल झाले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी दिली.